आत्महत्या

               जगात करमणुकीचे किती विषय आहेत, हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. मनोरंजन कशामुळे जास्त होते, हा एक संशोधनाचा विषय आहे.
विनोदाचे  प्रकार किती, हे ठरवायचे म्हटले तर प्रकरण शेवटी गुद्दागुद्दीवर येईल . हे सगळे जरी खरे असले तरी करमणूक, मनोरंजन, विनोद वगैरे वगैरे गोष्टी ज्या भोवती फिरतात, असा विषय म्हणजे "आत्महत्या !"

             तसे पहायला गेले तर (- किंवा असे पहिले तरी हरकत नाहीच !) 'आत्महत्या' म्हटल्याबरोबर अंगावर शहारे यायला हवेत ! छातीत धडकी भरली पाहिजे ! हातापायातले अवसान गळून गेले पाहिजे ! त्यांना कंप सुटला पाहिजे; शरीराला दरदरून घाम फुटावयास हवा ! ह्या सर्व गोष्टी व्हावयास हव्या हे खरे , पण -  महाभारत घडावयास दुर्योधन-धर्मराजाचा "पण" आडवा आलाच होता ना ? 'रोज मरे त्याला कोण रडे' ही जी काही म्हण (-का वाक्प्रचार ?) आहे ती खरोखरच खरी वाटते ! वर्तमानपत्राचे पान डोळ्याखालून सहज घातले, तरी आत्महत्येच्या नादाने एखादा/दी तरी खालून 'वर' पोचलेला/ली आढळतो/ते ! आपण उत्सुकतेने ती आत्महत्येची बातमी अधाशीपणाने वाचतो (-नाहीतरी ती दुसऱ्याचीच आत्महत्या असते ना !). आणि  वाचून स्वत:शीच पुटपुटतो- " आयला ! ही रोजचीच रड आहे. उपासमारीने बायका-पोराचा जीव घेऊन, कुटुंबकर्त्याने स्वत: आत्महत्या केली म्हणे ! त्या बिचाऱ्या 'कर्त्या'ला करता येण्यासारखी बरी आत्महत्या हीच बिचारी एक गोष्ट सापडते ! आपल्याला उगीचच मिस्कील हसू येते ! आपण दुसऱ्या बातम्या मख्खपणे नंतर वाचावयास सुरुवात करतो ! जाणारा जातो जिवानिशी , वाचणारा बिचारा वाचत बसतो !

            तर सांगायचा मुद्दा हा की पूर्वीसारखा 'आत्महत्या' हा प्रकार आता गांभिर्याचा राहिलेला वाटत नाही.  कुणीही उठतो आणि आत्महत्या
करतो, अशी आजची स्थिती आहे !  त्या गोष्टीत दु:ख करण्यासारखे काही उरलेच नाही . विरोधानेच म्हणायचे झाले तर, त्या गोष्टीत सुख दडले आहे-  म्हणजेच मनोरंजन, करमणूक, विनोद वगैरे वगैरे !

            काही वर्षाखाली एका पेपरात बातमी वाचली होती- " मालकाने आपल्याला हिप्पीसारखे केस वाढवू दिले नाहीत, म्हणून त्याच्या नोकराने
चक्क 'आत्महत्या' केली !"  अहाहा , किती आनंदाचा क्षण असेल त्या नोकराच्या आयुष्यातील आत्महत्येचा ! मालकापासून सुटका, केसांच्या
जंजाळातून पळवाट, कामापासून दूर आणि या पृथ्वीतलावरच्या महागाईतून मुक्ती !  एकाच वेळेस किती गोष्टी साधल्या बरे त्या एका क्षणैक आत्महत्येने !

             विनोदाचा भाग असा की, आमच्यावर आत्महत्येची कुणी वेळच येऊ देत नाही मुळी !  आम्ही हिप्पी होण्यास, पिताजींची साथ आहेच.
नापास झालो परिक्षेत कधी, तर माताजींची ममता सामोरी येते. प्रेमभंगाचे दारूण दु:ख आमच्या वाट्याला कुणी येउच देत नाही. कारण 'लाईन'
क्लिअर करतांना आमचा एक डोळा अंमळ बारीक झाला, तर प्रतिपक्षाकडून दोन्ही डोळे बारीक करून 'दाद' मिळते !  दुष्काळामुळे आत्महत्या करावी म्हटली, तर आम्ही खाल्लेली बाजरी अरगटमिश्रित न मिळता नेमकी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ निघते !  त्यामुळे माझ्या दृष्टीनेतरी आत्महत्या ही काळजी व चिंतेची बाब नसून एक फार्स आहे, करमणुकीचा प्रकार म्हणा ना !

             आत्महत्या करायला जावे आणि त्यातून वाचून नेमकी पोलीस-कोठडीची हवा खावयास मिळावी, यापरते मनोरंजन ते कोणते ?
ज्याची आत्महत्या यशस्वी होते, त्याला किती गंमत वाटत असेल ना ? 'मी आत्महत्या करतो', 'आत्महत्या पहावी करून', 'आत्महत्येला जेव्हां
यश येते'- अशा विषयावर लेख/नाटक/कविता लिहीणाऱ्यांना किती खमंग, चुरचुरीत 'विषय' मिळाला याची कल्पना यशस्वी आत्महत्याकर्त्यानाच
येईल !

         आपण व्यवहारात बोलताना पुष्कळवेळा म्हणतो की, 'अमुक एखादी गोष्ट येत नसेल तर, त्यापेक्षा आत्महत्या केलेली काय वाईट ?' म्हणजे असे पहा की, एखादी गोष्ट जमत नसेल तर चुटकीसरशी त्यावरचा तोडगा म्हणजे 'आत्महत्या' ! आता तुम्हीच सांगा- याहून चांगला विनोद कुठे आढळेल ? मनुष्याच्या अंगवळणी पडत चालले आहेत हे विनोद !

    ' मी ठरवलेल्या मुलीशी लग्न करीन, नाहीतर आत्महत्याच करीन !' 'आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही उपोषण करू(-पर्यायाने
आत्महत्या करू) ! 'आम्हाला परीक्षेत पास करा, नाहीतर आम्ही आत्महत्या करू !' - असली ही विनोदी वाक्ये कशी ऐकण्यासारखी वाटतात ना ?  मी तर म्हणतो की, ह्यानी असली 'जर-तरी' भाषा न वापरता, प्रथम आत्महत्या करूनच दाखवावी ! आत्महत्या हा प्रकार या धमकी देणाऱ्यांना भलताच मनोरंजक वाटत असावा ! आपले छत्रपती शिवाजी महाराज कधीच म्हणाले नाहीत -" मावळ्यानो, हे सर्व किल्ले जिंकून आणा, नाहीतर मी आत्महत्याच करतो! " उलट त्यांनी सर्व मोहिमांत सक्रीय सहकार्य केले !

             'अति केले नि वाया गेले' ही म्हण आत्महत्येच्या बाबतीत सार्थ आहे. ज्याच्या अंगी सामर्थ्य नाही, धडाडी नाही, उत्साह नाही, त्याने खुशाल हा प्रकार हाताळावा ! 'नेसेन तर शालूच, नाहीतर xxx बसेन' या असल्या आततायीपणाचा काय उपयोग ?

              जी गोष्ट करता येणे अशक्यच आहे, तिच्या वाटेला जाऊन डोकेफोड कशाला करायची ?  एखाद्या मंत्र्याने उद्या सर्वासमक्ष सांगितले
की, 'मी आता खुर्ची आणि पद दोन्ही सोडणार आहे !'- असले खोटेनाटे थापेबाज बोलणे ऐकण्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली काय वाईट, असा
विचार क्षणभर मनांत चमकून जातो !

         'धरले तर चावते अन् सोडले तर पळते'- हे म्हणणे आत्महत्येबाबत चिंतनीय आहे. करावी तर वाटते, पण केली, तर 'खानदानकी  इज्जत मिट्टीमें' जाईल म्हणून वैताग- असा विरोधाभास आढळतो .

               आत्महत्या अयशस्वी ठरली तर, यशाचे प्रयत्न मनुष्य का बरे करीत नाही, हे एक कोडेच आहे. अपयश पचवून आयुष्याला सामोरे
जाण्यात जो आनंद आहे, तो आत्महत्येने हसू करून घेण्यात नक्कीच नाही !  नापास होऊन आत्महत्येपर्यंत वेळ आणण्यापेक्षा, पासाच्या तयारीत वेळ का घालवू नये ? रागे भरल्याने वाईट वाईट वाटून आत्महत्या करण्यापेक्षा, आपल्या चांगल्या स्वभावाचे, चांगल्या पैलूंचे दर्शन का घडवू नये ? मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा, मिळमिळीत विचार मनात बाळगण्यापेक्षा, अपराधी मनाने आत्महत्या करण्यापेक्षा- सदैव ताठ मानेने प्रयत्नशील जगण्यात आत्मसमर्पण केलेले काय वाईट ?
.
                                
                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा