चिकाटी


        जगामधे चौसष्ट कला अस्तित्वात आहेत, असे समजले जाते. कुणी तरी आपले डोके लढवून पासष्टावीही कला असल्याचा दावा करतो ! कुणीतरी दुसरा कशाला पाहिजे, मी स्वत:च दावा करतो की "चिकाटी" ही मनुष्याची पासष्टावी कला आहे !

        उपरिर्निर्दिष्ट (काय, बरोबर लिहिला गेलाय ना शब्द !) चौसष्ट कला ह्या आत्मसात करून घ्याव्या लागतात. परंतु मी केलेल्या दाव्यातील 'चिकाटी' ही कला मनुष्याच्या जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत त्याला चिटकून (- का चिकटून !) असते.

        मनुष्य जेव्हा लहान मूल म्हणून जन्माला येतो, तेव्हाच त्याच्या कलेचा जन्म झाला म्हणून समजा. 'आईला सोडून न राहणे' ही जी चिकाटी तो धरतो, ती आपणहोऊन तो कधीच सोडत नाही- एकवेळ आई त्यालाच सोडून जाईल ! लहान वयात आई त्याला इतरांचा लळा लावण्याचा 'यत्न हाच परमेश्वर' करील, परंतु तो मात्र इतरांची लाळ घोटत राहणे शक्य नाही ! त्याची चिकाटी मोठी दांडगी हं ! काऊ-चिऊ-खाऊच्या नादात तो आईला विसरेल- पण क्षणभरच ! पुन्हा आपले 'आsssई ' करून भोकाड का काय म्हणतात, तेच पसरणार तो !

        आता  'चिकाटी' ही कला कशी काय असा प्रश्न आपल्यापुढे पडेल !
मनुष्य आपल्या अंगच्या गुणांना जे काही सोपस्कार घडवतो, त्यालाच आपण 'कला' असे म्हणतो . संगीत ही एक कला आहे. नृत्य ही दुसरी कला आहे. अशा ह्या ज्या काही चौसष्ट कला आहेत, त्या सर्वानी मिळूनच मनुष्य सर्वगुणसंपन्न होतो ना ! मग चिकाटी असण्याच्या कलेद्वारे मनुष्य आपल्या अंगचे गुणच उधळत नसतो काय ?

        'चिकाटी' या कलेलाच निरनिराळी अभिधाने काल-स्थलानुसार प्राप्त होतात. लहान मुलांच्या 'चिकाटी'ला आपण 'हट्ट' म्हणून संबोधतो . 'हट्ट' म्हटले की आपल्याला रामाने चंद्रासाठी धरलेला हट्ट आठवतो. याचाच अर्थ असा की, 'चिकाटी' ही कला रामायणकालापासून अस्तित्वात आहे. ती काही नवीन नाही. तरीपण तुम्हाला कुणाला माहित नसल्याने मला आज ती 'पासष्टावी कला' म्हणून सांगण्याचा खटाटोप करावा लागत आहे ! असो- काळाच्या उदरात अशा अनेक गोष्टी गडप झाल्या आहेत (-जाऊन पहा हवे तर !) . धनुर्विद्या शिकण्याची 'चिकाटी' बाळ एकलव्याने धरून शेवटी आपला अंगठा कसा गमावला, ते सर्वश्रुतच आहे. अशी ही असामान्य कला प्रत्येकाजवळ असतेच. परंतु त्या कलेचा आविष्कार घडवणे हे 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना'    
 असल्याने तिचे स्वरूप 'डिफरंट डिफरंट' तऱ्हेने आपल्याला जाणवते !

        'अति तेथे माती' या कलेचे स्वरूप होऊ शकते. कारण चिकाटी बऱ्याच वेळेस अंगलट येते. एखादी सुंदर 'चपला' रस्त्याने चालताना दिसल्यास, चिकाटीने तिचा हव्यास धरला तर, तिने तिच्या सुरेख 'चपला' आपल्याला दाखवण्याचीच पाळी की हो !

        कलेला काही मर्यादा असतात. तद्वतच चिकाटी ऊर्फ हट्ट ऊर्फ हव्यास ऊर्फ जिद्द ही मर्यादितच बरी दिसते ! एवढे मात्र खरे की या कलियुगात ह्या कलेला खूपच 'स्कोप' आहे. कारण बेकारीची कुऱ्हाड कोसळली म्हणून रडणाऱ्यापेक्षा, वशिल्याची जबरदस्त चिकाटी धरून ओरडणाऱ्याचीच आजकाल धडगत आहे ! महत्वाकांक्षा बाळगणाऱ्याच्या अंगी चिकाटी ही अगदी जाम भिनलेली असते- जणू काही 'भ्रष्टाचार निपटून काढू !' म्हणत हटून बसलेले उमेदवारच !

        चिकाटी ही पैशासाठी, रूपासाठी, धान्यासाठी असते वा अन्य कुठल्याही कारणासाठी ती असू शकते ! 'चिक्कूपणा' हा पैशासाठी असलेला 'चिकाटी'चा एक पैलू ! 'स्वामीभक्ती' हा सेवानिष्ठ चाकराच्या चिकाटीचा एक पैलू ! 'उधळेपणा' ही नादान माणसाच्या चिकाटीची पराकोटीला पोहोचलेली अवस्था ! 'भगीरथ प्रयत्न' ही मनुष्याची प्रांजळ चिकाटी ! अशातऱ्हेने चिकाटी ही पैलूदार आहे. सोनार मुशीतून तापवलेल्या सोन्यास सांगितल्यावर हुकुमानुसार जसा आकार देतो, त्याप्रमाणे चिकाटी 'धरावी' तशी 'दाखवली' जाते !

        पाच पाच वेळा एसएससीला बसण्याची चिकाटी धरून, नापास होणाऱ्यांची वाहवा करावी तेवढी थोडीच ! 'पुढच्या खेपेला तरी लॉटरीचे बक्षीस नक्कीच मिळेल'-अशी चिकाटी धरणाऱ्या पामरांची दु:खावस्था काय वर्णावी ! पुढल्या दाराने मते नाही मिळवली तरी मागल्या दाराने मते मिळवण्याची चिकाटी दाखवावी टी उमेदवारानेच ! एक धोरण फसले तरी बोध न घेता, सगळीच धोरणे फसवण्याची चिकाटी दाखवावी ती आपल्या 'माय-बाप' सरकारनेच ! बेसुमार भाववाढ झाली तरी मूग गिळून राहण्याच्या सामान्य भारतीय जनतेच्या चिकाटीला तर जगात कोठेच तोड नसेल ! मार-बोलणी खात  पांडुरंगभक्तीत विलीन होण्याची चिकाटी धरावी ती संत तुकोबारायांनीच !

        सारांश असा की 'चिकाटी' ही जी पासष्टावी कला आहे ती इतर सर्व चौसष्ट कलांच्याहीपेक्षा सरसच आहे. आत्मा आहे तर शरीर आहे, आत्म्यावाचून शरीर शून्य आहे ! याप्रमाणे ही पासष्टावी कला चांगली अवगत असेल तर, उरलेल्या सर्व कला सहज अवगत होतील. परंतु 'चिकाटीविना सर्व व्यर्थ' आहे .

        मनुष्याचे निराशामय जीवन आशादायी बनवण्यास चिकाटी या कलेचा चांगला फायदा आहे ! आनंदी, उत्साही जीवनासाठी चिकाटी 'मस्ट' आहे ! ताटीवरून स्मशानात पोहोचलेला मनुष्यदेखील जगण्याच्या चिकाटीमुळे काहीवेळा  घरी परतला आहे ! 'धीर धरी रे धीरापोटी, असती मोठी फळे गोमटी' हे चिकाटीचेच सार आहे.

           चिकाटी धरली तर आपल्याला आज स्वस्त धान्य दुकानात माल मिळतो. चिकाटी धरली तरच, नको तिथले दारू-जुगाराचे अड्डे पोलिसांना सापडतात ! चिकाटीमुळे आपल्या सहनशीलतेचा अंतच कधी होणार नाही ! चिकाटी धराल तर तुमच्या पुढ्यातील रिकाम्या पेल्यात जगण्यासाठी अमृत मिळेल, चिकाटी सोडाल तर त्या पेल्यात भरण्यासाठी विषही मिळणार नाही !
     
                          भिंतीवर चढून जाळे विणण्याची 'एका कोळ्या'ची चिकाटी माहीत आहे ना ! तशी (- दुसऱ्याच्या हातातून पेपर घेऊन) माझा हा लेख वाचण्याची तुमची 'चिकाटी' खरोखरच दांडगी आहे हं !
.

अभिप्राय


          " हं ! काय म्हणतोय यंदाचा दिवाळी अंक ?"
          "हे काय विचारणे झाले ? अहो नुसता बेष्ट नाही, अगदी 'दी बेष्ट' आहे म्हटल !"
- आणि वाचकहो ! इथच फसलात तुम्ही ! याला कारण म्हणजे तुम्ही दिलेला 'दी बेष्ट' हा अभिप्राय ! खरोखरच जर तुमच्या हातातील अंक वाचनीय असेल तर तुम्ही मुद्दामच 'टाकाऊ' या शब्दात त्याचे वर्णन करा. म्हणजे तुमचा सहवाचक तुमच्या 'अंका'ला हातही लावणार नाही ! नाहीतर सहवाचकाची पुढीलप्रमाणे मागणी तुमच्याजवळ ठरलेली आहेच -
" अरे वा ! बेष्ट आहे म्हणता ? मग बघूच पाच मिनिटे जरा इकडे तो ! थोडा चाळून देतो !" आणि मग त्या "चाळण्या"ला पाच तास तरी कमीत कमी लागणारच !

        आजचा जमाना निव्वळ अभिप्रायावरच जगात आहे, असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ति होणार नाही ! 'उठता बसता कार्य करता' अभिप्रायाशिवाय झाडाचे पानही हलू शकत नाही . दैनिक घ्या अगर साप्ताहिक घ्या, पाक्षिक घ्या किंवा वार्षिक घेऊन पहा. त्यात कुणीतरी कशावरतरी अभिप्राय दिलेला न आढळेल तरच आश्चर्य !

        मनुष्य जन्माला येतो तो, अभिप्रायासहच ! पुढील जीवन उकडा तांदूळ , कडू साखर नि पाणीदार घासलेट यांच्याबरोबरच कंठावे लागणार आहे, हे जन्मत:च मानवाला ज्ञात झाल्याने की काय, तो भावी आयुष्याबद्दलचा आपला अभिप्राय जोरदार शंखध्वनी करून मातेजवळ सादर करतो.

        एखादा वक्ता भाषण करत असल्यास त्यावरील प्रतिक्रिया दोन प्रकारच्या अभिप्रायांनी व्यक्त झालेली दिसते. प्रकार दोन असले तरी साधन एकच ! टाळी ! भाषण खरेच चांगले असेल तर, भाषण पूर्ण होईपर्यंत श्रोते चूप असतात. भाषण संपल्यावर त्यांना उमजते की, 'आपण या भाषणाला अभिप्रायच दिले ला नाही !' - दुसऱ्याच क्षणी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने वक्त्याला पावती दिली जाते. तर दुसऱ्या प्रकारात वक्त्याचे भाषण जसजसे कंटाळवाणे होत जाते, तसतसा टाळ्यांचा गजर वारंवार होऊ लागतो ! हा वक्रोक्तिपूर्ण अभिप्राय !

        अभिप्राय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले मत, आपला कल ! गवैय्यासमोर आपली मान हलवली की, त्याला 'दाद' मिळते ! खेळांमध्ये खेळाडूना वरचेवर दिले जाणारे प्रोत्साहन म्हणजे त्यांच्या खेळाची पसंती        !

        कित्येकांना उठसूट कशावरही, कधीही व कुणाजवळही आपले मत प्रदर्शित करण्याची खोड लागून राहिलेली असते ! तुम्ही नाटकाला जा, ते सिनेमाबद्दलचे अभिप्राय तुम्हाला ऐकवतील- मग ते त्यांनी स्वत: पाहिलेले असो वा नसो ! तुमचा नवा शिवलेला शर्ट त्यांना दाखवा की, त्यांचा उद्गार ठरलेला -
" वा ! शर्ट मस्त जमलाय, पण शिलाईच जरा मार खातीय बघा ! " आपल्यालाच त्यामुळे अकारण ओशाळल्यासारखे होते !

          कधीही अभिप्राय देणारे महाभाग विलक्षणच ! गौरवसमारंभात ते एखाद्याबद्दलची स्तुती आवेशाने करतील ! तर एखाद्या प्रेतयात्रेबरोबर जात असतानाही, ते चंद्रावरून परतलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावर जाण्याऐवजी, मंगळावर जाणेच का योग्य होते ? याबद्दल जोरजोराने आपला अभिप्राय पटवून देतील !

        एकाची निंदा दुसऱ्याजवळ, दुसऱ्याचे मत तिसऱ्याजवळ- अशा पळवापळवीत हे महाभाग सदैव पुढे असतात. अभिप्राय देण्यात आपले काही चुकते वा नाही याचे तारतम्य त्यांच्या गावीही नसते. त्यातल्यात्यात दोषयुक्त अभिप्राय बिनबुडाचे असतात, हे वेगळे सांगावयास हवेच का ? टीकेमधे सूर्याचे माध्यान्हीचे ऊन, तर अभिप्रायामधे पौर्णिमेच्या चंद्राचे शीतल किरण आढळतात . टीका म्हणजे जहाल शब्दात दिला गेलेला अभिप्राय असे समजण्यास काहीच हरकत नाही.

        'नाटकातील अमुक एका व्यक्तीचा अभिनय चांगला होता'- हा झाला योग्य अभिप्राय . पण टीका करताना हेच असे सांगितले जाईल की, 'नाटकातील अमुक एका व्यक्तीच्या हालचालीत अभिनयाचा खराखुरा अकृत्रिम आविष्कार होत असल्याचा वारंवार आभास होत होता.' पतंग उंच उडत असला तरी पुन्हा त्याला उंच उडविण्यास शेपूट लावण्याची कामगिरी टीकाकार करतो !
   
    चेंडूफळीच्या खेळात टाकल्या जाणाऱ्या फसव्या चेंडूप्रमाणे अनेक फसवे अभिप्राय आजच्या भेसळ युगात आढळतात. चित्रपरीक्षण, नाट्यपरीक्षण वाचून, चित्रनाट्यशौकीनाना अनेकदा वाचलेल्या व प्रत्यक्ष अनुभवलेल्या अभिप्रायात तफावत पडलेली जाणवते.

        भरपूर जेवल्यानंतरची ढेकर, पूर्वी नभोवाणीवरील 'आपली आवड' ऐकताना न आवरणारी  जांभई किंवा झोपेतील घोरणे हे काही उत्कृष्ट अभिप्रायाचे नमुने ! सिनेमाच्या पडद्यावर ओळखीच्या  अभिनेत्याचे दर्शन घडताच, लहान पण सुजाण मुले टाळ्या पिटतात. या त्यांच्या अभिप्रायात अभिनेत्याबद्दलचे अपार प्रेम आढळते. तर सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत सुरू होते न होते तोच काही टवाळखोरांचे चुळबुळदर्शक व थेटराबाहेर पडण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांचे  अपार राष्ट्रप्रेम (?) दाखवणारे अभिप्रायच नाहीत काय !

        ग्रंथाची प्रस्तावना हा ग्रंथावरील अभिप्राय असतो. सभागृहात आढळणारे खुर्च्यांचे तुटके हात व मोडके पाय असलेली टेबले हे सभागृहात झालेल्या चर्चेवरील अभिप्रायांचे द्योतक होय ! तर साभार परत हा लेखकूला संपादकाचा अभिप्राय ! ठराव आला तर चर्चा आणि पडला तर मोर्चा - हे ठरावावरील ठराविक अभिप्राय आहेत !

        अभिप्रायाची सत्यासत्यता पटणे फार कठीण. एक प्रसंग सांगतो:
श्री. घारूअण्णा जेवावयास बसलेले आहेत. सौ.घारूअण्णा एकेक पक्वान्नाची चव कशी आहे ते विचारत आहेत. दुसरीकडे त्या एका हातात लाटणे घेऊन मांजराला दूर सारत आहेत. अशावेळेस एक विशिष्ट पक्वान्न श्री.घारूअण्णांना पसंत पडल्याने त्यांच्या तोंडून "वा वा !" हा उद्गार सहजच बाहेर पडतो. सौ.घारूअण्णांचे लक्ष तिकडे जाताच, चुकून (!) त्यांच्या हातातले लाटणे, नेमके घारूअण्णांच्या तुळतुळीत टकलावरच आदळून तेथे  एका टेंगळाचा जन्म झाला ! वाचकहो, एक गुपित म्हणजे नेमके ते पक्वान्न सौ.घारूअण्णांच्या एका शेजारणीकडून वानवळा म्हणून आलेले होते. आता सांगा की, 'खरा अभिप्राय' कुठे आढळतो !

        हे सांगणे जरा कठीणच आहे. कारण असे की, उस्फूर्तपणे तोंडून बाहेर पडलेला उद्गार हा पुष्कळदा सत्याभिप्राय शकतो, हे जितके खरे - तितकेच स्त्रीच्या हालचालीतून आढळणारा अभिप्रायही कितीकदा असत्य नसतो हे खरे ! म्हणून घारूअण्णांचा 'वा वा' हा उद्गार व त्यामुळेच (नकळत) घडून आलेली शेजारणीच्याच पक्वान्नाची स्तुती, यांचा परिणाम म्हणून त्यांच्या हातून 'लाटण्याचे निसटणे' हाही घारूअण्णावरील प्रतिक्रियात्मक नैसर्गिक अभिप्रायच म्हणावा लागेल !

        आपण रहस्यकथा वाचत असताना नायकाशी समरस होऊन ठोशास ठोसा देण्याचा पवित्रा धारण करतो. विनोदी कथा वाचताना गडबडा लोळण्याच्या बेतात येतो. एखादी रद्दी कथा वाचताना भिकार वाटली की, आपण ती दूर फेकण्याच्या बेतात येतो. हे आपल्या हालचालीतून व्यक्त होणारे 'अभिप्राय'च होत !

        'अरेरे' किंवा 'अहाहा' हे उद्गार आपण पाहिलेल्या दृश्यावरील अभिप्राय रोजच्याच जीवनात वापरावे लागणारे आहेत . आजच्या जमान्यात 'च्यायला !' हा विस्मयतादर्शक अभिप्राय आणि 'हात्तेरेकी !' हा तुच्छतादर्शक अभिप्राय खूपच रूढ झालेले आहेत.

        शरीराच्या प्रत्येक अवयवाबरोबर एकेक अभिप्राय निगडीत असतो ! त्यामुळेच मनुष्याला चैतन्य प्राप्त होते . त्याचा आळस दूर झाडण्यास मदत होते. रसिक वाचकांचा अभिप्राय न मिळता, तर तमाम लेखकांचा मुडदाच पडता !

        आता हेच पहा ना- हा सबंध लेख तुम्ही न कंटाळता वाचून काढलात . काढलात तो काढलात नि तुम्ही नाही फाडलात, आणि फाडला नाहीत- यातच अस्मादिकांना "अभिप्राय" गवसला !

.            

फुलून जाऊ विसरुन काटे . .


तुझ्या पापण्यांच्या आड
ते दडलेले सारे मोती
नको कुठेही बाहेर काढू
अमोल माझ्यासाठी किती-

ओघळेल मोत्यांची सर
माझ्या आसवात भर
तूही दु:खी मीही दु:खी
दु:खाचा ग नको पूर -


खाली मातीमोल होती
जाऊ देणार ना वाया
जपून ठेविन सारे मोती
ओंजळीत हातांच्या या -

होईल मनांचे ग मीलन
वाट जरी अवघड वाटे
दु:खानंतर येईल सुख
फुलून जाऊ विसरुन काटे . .


.

समेट

सांग साजणा, गुपित आपुले किती कसे आवरू
तू दिसता का मनात फडफडते रे फुलपाखरू -

लाली चढते गाली, ओठी गीत बघे थरथरू
कंप अनामिक देही माझ्या, सांग कसा आवरू -

आठव नुसता मनात होता, मन लागे मोहरू
प्रत्यक्षातच समोर जर तू, किती मला सावरू -

पुरे चोरट्या गाठीभेटी, उघड उभयता करू
चल, सर्वांच्या साक्षीने रे, फेरे सात धरू ..


.

सिनेमा

        मातेच्या कडेवर बसणाऱ्या बाळापासून ते काठीचा आधार घेणाऱ्या वयोवृद्धापर्यंत 'सिनेमा' हे सर्वांचे आकर्षण असते ! ज्याने 'सिनेमा' ही चीज काय असते, हे माहित करून घेतले नाही, तो प्राणीमात्र त्याच्याइतकाच दुर्दैवी !

        मनुष्य एकवेळ ऑक्सिजनविना राहू शकेल, पण सिनेमाचा विरह अगदी अशक्यप्राय ! सिनेमा ही चैनीची बाब आहे. गरीब लोकांचा 'पिच्चर' पाहण्याकडे विशेष लळा असतो. वेळप्रसंगी उपास करतील पण सिनेमासाठी थोडी पुंजी ठेवतील ! मध्यम वर्गाचे तर 'सिनेमा' हे एक मनोरंजनाचे साधन आहे. समस्त कुटुंबपरिवारासह महिन्यातून एखादा सामाजिक वा कौटुंबिक सिनेमा पाहण्याचा त्यांचा सोहळा काय वर्णावा ? श्रीमंतवर्ग तर खर्चाचा भलताच शौकिन ! जास्त पैसा खर्चण्याचे त्यांना सिनेमा हे प्रभावी(!) साधन आहे.
       
        जनतेच्या हौसेला मोल नाही ! महागाई वाढली म्हणून संप होतो, मोर्चे निघतात, दंगली माजतात, निदर्शने केली जातात ! पगार पुरत नाही म्हणून संसारात भांडणे होतात ! चिल्लर नाही म्हणून बाजारात उगाचच आरडाओरडा होतो. 'अफू खायलाही दमडा नाही' 'बेकारी शिगेला पोहोचली आहे' - असा कंठशोष होतो ! या महागाईने पोळलेली, अपुऱ्या पगारात गुजराण न करू शकणारी, पैसा जमल्यावर अफू खाऊ इच्छिणारी 'बेकार' जनता- चिल्लर जमवून सिमेमा मात्र कशी पाहू शकते, या विचाराने परमेश्वरही रात्रंदिवस  हैराण होत असावा !

        सिनेमामुळे आपल्यावर चांगला परिणाम होतो, असा एक समज आहे. 'हरे राम हरे कृष्ण'  हा देवाबद्दलचा एखादा छान सिनेमा असेल असे वाटून, शेजारच्या बंडूच्या आजोबा-आजीनी तो चक्क चोरून पहिला होता. पण नंतर त्यांच्यावर 'हाय राम'म्हणण्याची पाळी आली ! 'नावात काय आहे' असे विचारणाऱ्या, एका माजी नाटककाराला हा आजोबा-आजीचा दाखला समर्पक वाटला असता !

        सिनेमामुळे रावाचा रंक होतो व रंकाचा राव होऊ शकतो. सिनेमावर 'माया' केल्याने मायाजालातच फसून, आपली 'माया' संपुष्टात येते, हे पूर्णपणे समजण्यास काया जीर्ण होऊन, वाया जाऊ द्यावी लागते !

        बाकी सिनेमाचे वर्चस्व भलतेच आहे हं आपल्यावर ! पैज लागली की, हार जीत सिनेमानेच ठरली जाते. प्रियकर-प्रेयसीना 'सिनेमा'चा अंधारच 'प्यारा' वाटतो ! थोडा पैसा हाती खेळताच शुभारंभ 'पहिल्या दिवशी पहिला खेळ' पाहून करावा वाटतो.

        सिनेमातील 'हिरो-हिरोईन-व्हिलन' आदि मंडळीवर तमाम जनतेचे प्रेम असते. जनता प्रत्येकात स्वत:ला 'त्यापैकीच कोणीतरी' समजून सुखाचे चार क्षण कंठत असते ! सिनेमातील हीरोचे हिरोईनसह रोमान्स पाहून जनता खूष होते. ह्या जनतेत बरेचसे 'पबलीक'च असते. हिरोची व्हिलनसह दण्णादण्णी  बघून पब्लिक आपसातच दणादण दणके देऊन थेटरात दाणादाण उडवते. असल्या गमतीदार 'शिणेमा'ने पब्लिक हसून हसून पोट दुखेपर्यंत लोळते. बिचाऱ्या पब्लिकला त्यामुळे शिनेमा सुटल्यावर, राष्ट्रगीताला मान द्यायचे भान राखायचे सुचत नाही ! शिनेमा खास जनतेसाठी गाजत असतो, तर राष्ट्रगीत फक्त सरकारी नियमासाठी वाजत असते !

        हल्ली सिनेमा म्हटला की तो 'हाउस फुल' असतो. तो तसा असला की समजावे, तिकीट विक्री काळ्या बाजाराने चालू आहे ! जनतेने उगाच लांबलचक रांगेत तिष्ठत उभे राहून तिकीट विकत घेण्यापेक्षा, चारच पैसे जास्त देऊन 'अधिकृत' काळाबाजारवाल्याकडून ते घेऊन, आपला अनमोल वेळ, त्रास वाचवावा, असा शुद्ध व प्रामाणिक हेतू थेटरमालकाचा त्यावेळी असावा !

        शिवाय रांगेत उभे राहिल्याने चेंगराचेंगरी होऊन माणसे मरतात, उन्हाने चक्कर येते, खिसे कापले जातात, स्त्रियांना धक्काबुक्की होते- हे सर्व टाळण्यासाठी व काळाबाजार करणारे तिकीट विकूनच जगतात, म्हणून त्यांच्या चरितार्थाची सोय होण्यासाठी 'सिनेमा'वाले सिनेमा लगेच 'हाउस फुल' करत असावेत !

        सिनेमात काम करून पडद्यावर चमकण्याचे कित्येकांचे ध्येय असते. ध्येयाविना आयुष्य म्हणजे खुर्चीशिवाय मंत्रीच की हो ! सिनेमा पाहिल्यावर शरीराच्या सर्वांवयाना व्यायाम मिळतो. सिनेमा रद्दी असेल तर खुर्च्यांवर खुर्च्या आदळून हाताचे स्नायू पिळदार बनण्याचा संभव असतो. खुर्च्यांची बैठक लाथेने थडाथड उडवून आपल्या 'जातभाई'ची आठवण काढता येते. अस्प्रो-अनासीन-अवेदन-अमृतांजन आदि औषधे अधिकाधिक आवडू लागतात ! घरी 'कुटुंबां'मुळे झोप येत नसेल तर चार पैसे टाकून सिनेमा पाहण्याच्या निमित्ताने तीन तास निवांत घोरत येते ! स्वत: खुर्चीवर बसून नवऱ्याना थेटराबाहेर पोरे सांभाळावयास लावण्याची, बायकांना 'सिनेमा' ही तर अपूर्व संधीच असते !

        सिनेमा चांगला असेल तर खूप लोक सिनेमा बघतात. मग सरकारलाही त्यामुळे खूपच 'करमणूक कर' मिळतो. अशा रीतीने सिनेमा काढणारे खूष, पाहणारे खूष, सरकारही खूष ! मग काय- त्या खुशीत चार काळा बाजारवालेही खूष केले गेले तर कुठे बिघडते ! त्यानी खुषीने 'खुषी' दिली की, बंदोबस्तवालेही खूष !

        सिनेमा हे जाहीरातीचेही प्रभावी साधन आहे ! पूर्वी लाल त्रिकोणाची, कुटुंबनियोजनाची जाहिरात किती कौशल्याने दिग्दर्शक करत होते ! (अंदरकी बात तुमच्या-आमच्यातच राहू द्या !). सिनेमाद्वारे लोकांना बोध मिळतो- 'डबड्या 'त जाऊन तमाशा पहावा, पण 'हाऊस फुल्ल'च्या सिनेमाला कधी जाऊ नये म्हणून ! सिनेमामुळे मनोरंजन होते- डोअरकीपर, सायकलस्टँडवाले व मध्यंतरात लुडबुड करणारे यांचे ! सिनेमा सुटल्यावर भसाड्या व खराब आवाजातल्या ध्वनीमुद्रिका ऐकवून व ते राष्ट्रगीत समजून पडद्यावर एखादा उलटा झेंडा दाखवणाऱ्या थेटरम्यानेजराचे कौतुक करावेसे वाटते !
.
          

"भाव"- तोचि देव


        कोणत्याही वस्तूच्या रद्दीपासून ते थोर थोर पुढाऱ्यांच्या पी. ए. पर्यंत "भाव" या शब्दाचा राबता असतो. हा राबता 'टर्म बेसिस'वर असतो. तो कुणाजवळ किती काळ राहील ते सांगता येत नसते.नटीच्या नवऱ्याप्रमाणे तो बदलत असतो. रेशन दुकानात साखर आली आली म्हणेपर्यंत ती जशी एकाएकी लुप्त झालेली समजत नाही, तसे या 'भावा'चे आहे.

        उदाहरणासह ह्या भावाचा महिमा आपण पडताळून पाहू ! 'भाव खाण्या'संबंधी प्रथम चर्चा करता येईल.
"अरे बंड्या, लेका एक्झ्याम आठवड्यावर आलीय रे ! तुझ्या नोट्स दोन तासांकरताच दे ना !"
- इति बाळ्या नामक प्राणी.
" छे बुवा ! मला नाही जमणार ! माझी अजून पहिली रिव्हिजन देखील झाली नाही !"
- बंड्या या स्कॉलरने मित्रावर झाडलेल्या या दुगाण्या 'भाव'दर्शक आहेत ! हा भाव खाण्याचाच प्रकार आहे. शाळा-कॉलेजात ह्या भाव खाण्याची फार चटक असते. स्कॉलर-विद्यार्थी, कॉलेज-चँपिअन, कॉलेज-क्वीन, जनरल सेक्रेटरी या व्यक्ती भाव खाण्यात महशूर (का मशहूर?) असतात. काही 'हिरो' उन्हाळ्याच्या सुट्टीत सायंकाळी थिएटरच्या आसपास डोळ्यांवर गॉगल चढवून, अंगात चट्ट्यापट्ट्यांचा स्वेटर घालून, पायात (तळ नसलेले) बूट घालून भाव खाताना (दुसरे काही खावयास न मिळाल्याने) आढळतात.

        विशेष म्हणजे शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही 'हारी'ना भाव खाण्यासाठी आवडतो ! तो समस्त धर्म-जाती-पंथास खाता येतो. एक गोष्ट सांगणे आवश्यक आहे की, भाव खाणाऱ्याला काही पथ्ये पाळावीच लागतात. प्रमुख पथ्य म्हणजे भाव प्रमाणातच खावा ! जास्त खाल्ला- तर उलटण्याची भीती असते. परवाच एका हिरोने एका तरुणीपुढे जास्त भाव खाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपचनामुळे स्वत:च्या गालावर तरुणीच्या पायातील एक चप्पल चोळून घ्यावी लागली !

        मित्र पाहून पैसे मागावे लागतात, तद्वतच प्रसंग पाहून भाव खाण्याची तयारी करावी लागते! भाव खाणारा दुसरा प्राणी म्हणजे प्यून उर्फ पट्टेवाला ! मग तो कुठलाही असो- जि.प.च्या शाळेचा वा सरकारी कार्यालयातील ! हा प्यून त्याच्यावर सोपवलेले काम कधीच पार पडत नसल्याने, खास 'भाव खाण्या'साठीच नेमलेला असतो, असा आमचा अंदाज आहे. या सर्व उदाहरणावरून तात्पर्य हेच की, 'भाव खाणे' म्हणजे चढून जाणे , घमेंडखोर बनणे, सांगितलेले काम न करणे !

        "साहेब, देव तुमचं भलं करील ! पोरंबाळं चांगली राहतील ! तुमच्यासारखा (पाप केलेला-) पुण्यात्मा कोणी नाही !" - इति रस्त्यावरचा भिकारी ! हा 'भाव देण्या'ची क्रिया दर्शवतो. भाव देणे म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, स्तुती करणे वगैरे  ! भाव देणारी व्यक्ती ही गरजवंत , प्रसंगी लाचार, स्वार्थी, आपमतलबी- तर कधी आवळा देऊन कोहळा काढणारी असते. भिकाऱ्याने भाव दिला की, त्याला पैसा मिळतो. घरमालकाला भाव दिला की, घर फुकटात दुरुस्त करून मिळते. सासरा जावयाला नेहमी भाव देतो- कारण तो त्याची कन्या सांभाळणारा असतो ! मंत्र्यांना भाव दिला की (निदान-) आश्वासन तरी मिळते.

        भाव दिल्यानंतर घडून येणारी क्रिया म्हणजे 'भाव चढणे!' भाव चढलेली व्यक्ती "माझ्यासारखा मीच!" असे छाती बडवून सांगणारी असते. 'हम करेसो कायदा!'- असे दंडा आपटून गर्जणारी आयुबखान टाईप मूर्ती भाव चढलेली असते. मदिरा प्राशन केल्यावर जशी ती चढते, त्याप्रमाणे कुणी दिलेला भाव खाल्ला की तो चढू लागतो !

        भाव चढण्याचे कारण पुष्कळदा 'पैसा' हे असू शकते. भाव चढलेला माणूस आपलेपणा विसरतो. माणसातील 'मी' हा 'मी' न राहता त्याला 'आम्ही'चे स्वरूप येते. पूर्वी सायकलकराचा बिल्ला तपासणारे कारकून, थिएटरातील डोअरकीपर्स, लॉटरीमुळे नशीब उघडलेला इसम वगैरे व्यक्ती भाव चढणाऱ्या म्हणून वानगीदाखल सांगता येतील !

        परंतु चढणारा नेहमी पडतोच ! घोड्यावर रडतराव चढल्यावर किती काळ बसू शकणार ? चढलेला भाव उतरणीला लागला की, माणसाचे डोळे फिरू लागतात ! भाव पडलेल्या वस्तू वा इसमाचे हालकुत्रा देखील खात नाही ! भाव चढणे ही क्रिया क्षणैक असते.

        अचानक घडून येणारी क्रिया म्हणजे 'भाव येणे !' सर्वांच्या आयुष्यात स्थित्यंतरे घडवून आणणारी ही क्रिया होय ! गरीब माणूस श्रीमंत होऊ लागला की, त्याला भाव येऊ लागतो ! शिकला सावरलेला मुलगा उपवधू झाला की. त्याला लग्नाच्या बाजारात भाव येतो. भाव येण्याची क्रिया सर्वत्र आढळते. कागदाच्या रद्दीलाही भाव आलेला आपण पाहतोच,  की नाही ? सोने-चांदी, कांदे-बटाटे यांच्यावरही भाव येण्या-जाण्याची क्रिया सतत चालू असते ! परीक्षेच्या आधी क्लासेस, गाईड्स यांना भाव विलक्षणच येतो ! भाव येण्याची क्रिया ही आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. एखाद्या महाराजास भाव येण्याची वेळ ही त्याच्याभोवती हिंडणाऱ्या भक्तगणांच्या भक्तिभावावर अवलंबून असते. रेशनिंगच्या काळात तांदळाइतकाच भाव खड्यांनाही येतो. माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव व अवयवाचे हावभाव त्याला मिळणाऱ्या भावाबरोबरच बदलत असतात !

        सर्वात वाईट प्रसंग असतो, तो भाव जाण्याचा ! हा प्रसंग बहुधा निवडणुकीत डिपॉझिट जप्त  झालेल्या उमेदवारावर येतो. बिचारा उमेदवार ! आपले सर्वस्व पणाला लावून तो निवडणुकीला उभा राहिलेला असतो. पाण्यासारखा (म्हणजे नक्की कसा?) पैसा खर्च करून शेवटी त्याला अपयश सदऱ्यात पाडून घ्यावे लागते ! हा हन्त हन्त ! समाजात त्याला कवडीमोलाचा भाव शिल्लक उरतो. निवडणुकीत निवडून येऊन भाव खाण्याऐवजी त्याला मूग गिळत रहावे लागते !
        शेवटी भाव असण्याबद्दल थोडेसे ! भाव असणे याचा अर्थ विशिष्ट दर्जा असते, प्रतिष्ठा असणे ! काही गोष्टींना निश्चित भाव असतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास- मंत्र्याची खुर्ची ! खुर्ची आहे तोपर्यंत मंत्र्याला भाव असतो ! जोवर एखाद्या देशाचे नेतेपद एका स्त्रीकडे असते, तोवर त्या देशात सर्व स्त्रियांना भाव असतो (वाचक भगिनी खूष हं !). इंटरव्ह्यूसाठी शिक्षणापेक्षा वशिल्याला जास्त भाव असतो ना ? सध्याच्या काळात गल्लाभरू चित्रपटाना भाव आहे, हे आपण पाहतोच (चित्रपट न पाहताही !).

        सर्वांनाच पटेल की, 'भावा'चा महिमा थोर आहे. प्रत्येकाजवळ थोडातरी भाव पाहिजेच ! कधी खाण्यासाठी तर कधी दुसऱ्याला देण्यासाठी ! आजकाल जळी,काष्ठी, पाषाणी, दुकानी, काळ्या बाजारात, सर्वत्र 'भाव' हिंडत असतो.                                      
        निवडणुकीत निवडून आलेला पुढारी हा एकपात्री भावाचे नाटक उत्तम करतो ! कसे ते पहा ! निवडणुकीआधी तो सर्व मतदारांना भाव देतो. मतदान होताना त्याचा भाव चढत जातो. निवडून येताच त्याला भाव येतो. भाव एकदा 'आला' की तो 'खाण्या'खेरीज त्याला गत्यंतरच नसते.

        म्हणून मनात सर्वांविषयी एक(च) भाव पाहिजे, नाहीतर- 'मनात नाही भाव, देवा मला पाव', हे कसे शक्य आहे ? म्हणून म्हणतो की, 'देव भावाचा भुकेला' व "भाव" तोचि देव !

        हा लेख छापून आल्याने, अस्मादिकानाही भाव आहे, असे वाटते ! नाहीतर हा लेख आधीच बाराच्या भावात ( - हा भाव केराच्या टोपलीत सापडतो हं !) गेला असता ना !

.

चेहरा


               एक मनुष्य निवांतपणे ईश्वरनामाचा जप करत बसला होता. दुसऱ्या मनुष्याने त्याच्याजवळ येऊन विचारले- " बाबा रे ! तू उगाच का रडत बसला आहेस ? "  त्यावर पहिला स्वस्थपणे उत्तरला - " मी सध्या ईश्वरप्राप्तीच्या आनंदात धुंद झालो असतानाही तुला रडका वाटतो, यात तुझी काहीच चूक नाही ! त्या कर्त्या-करवित्याने घडवलेला माझा हा "चेहरा" तुला तसे भासण्यास कारणीभूत होत आहे ! "  

          -  तर सांगायचा मुद्दा हा आहे की, मनुष्याचा ' चेहरा ' ही त्याला मिळालेली देणगी आहे ! 'दिसतो तसा नसतो' असे म्हणण्याचा प्रघात या चेहऱ्यामुळे पडला असावा. परमेश्वर मोठा लबाड आहे ! स्वत:चा चेहरा निरनिराळ्या अवतारात निर्विकार ठेवून इतरांचे चेहरे खुलवण्यात तो मोठा वाकबगार आहे !

          मूल जन्मले की, एक नवा चेहरा पृथ्वीवर अस्तित्वात येतो. या एका चेहऱ्यामुळे साऱ्या सृष्टीचा चेहरा मोहरा बदलू पाहतो ! हसऱ्या चेहऱ्याचे मूल आनंदमयी सृष्टी निर्माण करते. मख्ख चेहऱ्याचे मूल सभोवतालच्या परिवारात नाना तर्क-वितर्क-कुतर्क निर्माण करते. रडक्या चेहऱ्याचे मूल आसपास खळबळ माजवते.

          मनुष्य 'चेहऱ्या'वर जगत असतो. चेहऱ्यावरून बऱ्याच वेळा त्याची पारख करण्यात येते. पण ती कित्येकवेळा चुकीची ठरते ! त्यामुळेच 'बिनचेह-या'चा अमिताभ बच्चनसारखा कलावंत धूमकेतूसारखा सिनेमाच्या पडद्यावर भाव मारून जातो.

          ओठाचा चंबू करणे, प्रश्नार्थक चेहरा, स्तंभित चेहरा, मुखस्तंभासारखा चेहरा, चिंताक्रांत चेहरा वगैरे चेहऱ्यांचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की, मनुष्याचा चेहरा हा त्याच्या मनाची प्रतिक्रिया दर्शवतो !

          मुद्देमालासह चोर पकडला गेला की, त्याचा 'चेहरा पडतो'. मनुष्य खोटारडा ठरला की, तो 'चेहरा टाकतो'. प्रियकर व प्रेयसी एकांतस्थळी प्रणयाराधन करत असताना एखादा पेन्शनर तेथे नेमका टपकतो, त्यावेळी त्या युगुलाचा 'चेहरा फोटो काढण्यालायक' होतो ! दुष्काळात पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या की, शेतकऱ्याचा 'चेहरा हरखून' जातो. निवडणूक जवळ आल्यावर उमेदवारांचा 'चेहरा' मतदारांना भेटताना 'उजळतो '! तर निवडणूक संपताच मतदारापासून तो 'चेहरा काळा करतो !'

          'चेहऱ्या'वरून भविष्य सांगणारे ज्योतिषी असतात. स्वत:चा चेहरा कायम गंभीर ठेवून दुसऱ्यांचे चेहरे हर्षाने खुलवणारे विदूषक खरोखरचे कलाकार होय ! या उदाहरणावरून मनुष्य 'चेहऱ्या'वर जगतो, हे म्हणणे पटते ना ! पडद्यावरील कलाकार पडद्यामागे निराळ्याच भूमिका जगतात. तद्वतच मनुष्य 'भासणाऱ्या' चेहऱ्यापेक्षा अंतर्यामी वेगळाच असतो, हा विलक्षण विरोधाभास आहे !

          वर्गामधे मुखदुर्बळ भासणारा चेहरा, जेव्हा क्रीडांगणावर खेळात चमकतो, तेव्हा आपला चेहरा प्रश्नार्थक निश्चितच होतो. घरातील गरिबीची अवस्था हसऱ्या चेहऱ्याने लपवू पाहणाऱ्याचा प्रयत्न आपल्याच चेहऱ्याला बुचकळ्यात पाडतो. स्त्रीवरील अत्याचार पाहूनही 'चेहऱ्याची इस्त्री न बिघडवणारा' मनुष्यप्राणी पाहून आपला चेहरा उद्गारवाचक होतो !

          'चेहरा' हा जादूगार आहे. 'पुढारी'छाप चेहरा दिसला की, तेथे त्याचे पित्ते जमतात. आवडता हिरो पडद्यावर दिसला की, कॉलेजकन्यकांचे कौतुक करावे तरी किती ? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नुसता ओसंडून वाहताना दिसतो ! उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुट्टीत नको असणारा पाहुणा टपकला की, यजमानांचे  'सुतकी चेहरे' बघावेत !

          हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध वगैरे सर्व भावना चेहऱ्यावरून कळतात ! एकच चेहरा 'तो मी नव्हेच !'- असे सांगून लाखो लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो ! हा एकच चेहरा चलाखीने बहुरुप्याचे खेळ खेळतो !

          'चेहऱ्या'स किंमत आहे, महत्व आहे ! 'नवे चेहरे पाहिजेत !' - अशी जाहिरात देणाऱ्याचा सिनेमाविषयक गाढा अभ्यास असावा, असा आपला अंदाज असतो ! पण फसलेले 'भोळे चेहरे' जाळ्यात सापडताच, जाहिरात देणारा 'बिलंदर चेहरा' बेपत्ता होऊन जातो ! चेहरा पाहून केलेले आपले अंदाज वेधशाळेच्या हवामानाच्या अंदाजाइतकेच अचूक (?) असतात !

          आपला चेहरा 'प्रति मुमताज' आहे, असे समजून वागणारी टूनटूनसारखी तरुणी पाहून, आपण चकीत होतो. चांगल्या चेहऱ्याचे तरुण आपण 'राजेश' टाईप चेहऱ्याचे आहोत, असे समजून 'राजेंद्रनाथ' होऊन बसतात !  आपल्या चेहऱ्याचे महत्व आपणच ओळखले पाहिजे. आपले स्वत:चे असे अस्तित्व आपण आपल्या चेहऱ्याने दर्शवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रद्धांजलीच्यावेळी 'सुतकी', आनंदप्रसंगी 'नाटकी', प्रवासप्रसंगी 'भटकी', गोंधळप्रसंगी 'झटकी' चेहरा ठेवण्यात, आपण निष्णात व्हायला पाहिजे ! "देश तसा वेश" परिधान करता आला पाहिजे ! 

          चेहऱ्याला महत्व आहे, म्हणूनच बाजारात सौंदर्यप्रसाधनांचा आज खप आहे ! चेहरा 'तजेलदार' बनवण्यास स्नो-पावडर, चेहरा 'गुळगुळीत' ठेवण्यास ब्लेड्स, चेहरा 'स्वच्छ' ठेवण्यास साबण, रुमाल वगैरे साधनांचा सर्रास वापर होतो . चेहऱ्याची शोभा वाढवण्यास केसांची वळणे, गालावरील कल्ले, मिशीचे कट, गुळगुळीत दाढी वगैरेंची मदत घ्यावी लागते.


          चेहऱ्यावरून कधी कधी माणसांची ओळख पटते. प्रवासात भेटलेल्या सोबत्यास आपण नंतरच्या भेटीत  बरेचवेळा म्हणतो, "तुमचा चेहरा मागे कधीतरी पाहिल्यासारखा वाटतो !" वास्तविक आपल्या मनात कितीतरी चेहऱ्यांचे ठसे आधीच उमटलेले असतात ! लांब दाढी-मिशात लपलेला चेहरा आपल्याला रवींद्रनाथांची आठवण करून देतो. इंचभर वाढलेली दाढी बुल्गानिनची आठवण करून देते. गालावर वाढलेले कल्ले व मानेवर स्त्रियांप्रमाणे वाढवलेले केस, या अवतारातील 'हिप्पी' पाहून, आपल्याला उगीचच जुन्या 'इन्सानियत'मधील 'झिप्पी'ची आठवण होते !

          चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून आहे ! 'बावळट' चेहरा 'कारकुना'चे व्यक्तिमत्व दर्शवतो. 'सुहास्यवदनी' चेहरा 'पुढारी' जातीचे प्रतिक आहे ! 'बिलंदर' चेहरा 'कामचुकार व्यक्ती'चे निदर्शक आहे ! 'प्रसन्न' चेहरा 'दिलखुलास' व्यक्तिमत्व दर्शवतो !

           चेहऱ्याशिवाय जीवन म्हणजे काचेशिवाय आरसा ! जीवन सुखमय घालवायचे असेल तर, आत्मस्तुतीचा चेहरा टाकून द्या, परस्तुतीचा चेहरा धारण करा ! सिनेमातील हिरो याच मार्गाने जाऊन सुखी होतो, त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात- "तेरा चांदसा चेहरा-" किंवा "चौदहवीका चांद हो तुम " वगैरे वगैरे !

          माणसाने चेहरा मिस्कील केला की समजावे- त्याला काहीतरी खुसखुशीत वाचायला मिळालेले आहे !    पण वाचकहो ! तुम्ही का चेहरा असा मिस्कील केला आहे ? तुम्ही खरोखरच हुषार आहात हं ! ( ही मी केलेली परस्तुती हं ) !

.                    
                 

तीन व्रात्यटिका


१)  अबोला -

नाही मी जर ऐकले तिचे
बायको अबोला धरणार आहे -
अबोल्यातल्या 'नियम अटी'
रोज मी दिसभर ऐकणार आहे !
.
 
 
२) आधुनिक-

मी लिहिलेले अभंग माझ्यासमोर
बायकोने हौदात बुडव बुडव बुडवले -
झेरॉक्स कॉपीज होत्या म्हणून
मी बायकोला अजिबात नाही अडवले !
.

३)  दर्शन-

आज चतुर्थी आहे म्हणजे
देवळात ती असणार आहे -
निघावे म्हणतो देवळाकडे
जमल्यास..देवदर्शन घेणार आहे !
.

तुझ्या डोळ्यांच्या डोहात -


पहात राहिलो खोलवर
तुझ्या डोळ्यांच्या डोहात
भिजू लागले एकेक अक्षर
घुमू लागला नाद शब्दात ..

नादात उमटले प्रतिबिंब
माझ्या डोळ्यात गहिरे
शब्दांतून बनली कविता
रूपरंग घेऊन साजिरे ..

लकाकू लागले तुझे डोळे
हलू लागले माझे प्रतिबिंब
कवितेची प्रतिमा खोलखोल
डोहात थिजली भिजून चिंब
.

"चिडकी चिऊताई -" (बालकविता)



खिडकीत दिसली चिऊताई
बाळाची बोलावण्याची घाई
"ये ये" म्हणाला हात दाखवून
"खाऊ घे" म्हणाला खिडकीतून -

चिऊताई होती फारच चिडकी
समोर दिसली बंद खिडकी
चोच आपटली खिडकीवर
टकटक केली काचेवर -

बाळाने उघडली हळूच खिडकी
पटकन शिरली चिऊताई चिडकी
बाळाने दाखवला लाडूचा खाऊ
चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -

बाळाने मुठीत लाडू लपवला
बाळ हळूच खुदकन हसला -
चिडकी चिऊताई खूप चिडली
खिडकीत "चिव चिव " ओरडली . .

.

आयुष्याची रहस्यकथा -


अडचणींचे थोडेफार शब्द
विखुरलेला पूर्वार्ध संकटानी
गूढ अनाकलनीय प्रसंग
असंख्य वर्णने पानोपानी . .

माझ्या आयुष्याची रहस्यकथा
लिहून ठेवलीय विधात्याने,
पाच सात पाने दु:खांची
एखादा परिच्छेद भारला सुखाने . .

चाळत बसलो आहे उत्तरार्ध
हाताळलेलीच जीर्ण पाने -
पुस्तक थरथरत आहे ;
वाचणार शेवट अधीरतेने ..

शेवट आधीच कळू नये..
जबरदस्त रहस्यकथालेखन आहे
कलाटणी देण्यासाठी अर्धे पान
शेवटी कोरेच सोडलेले आहे . . !
.

दाढी- एक संशोधन


                    जगात सगळ्यात सुखी प्राणी कोणता असेल, तर तो म्हणजे बोकड ! कारण त्याला दाढी असून ती 'करावी' लागत नाही!'  'दाढी का केली नाही' असे विचारणारा त्याचा कुणी वरिष्ठ अधिकारी नाही. सकाळ झाल्याबरोबर गूळझोपेतून त्याला उठवून 'दाढी करून अंघोळ आटोपून घ्या' असा लकडा त्याच्यामागे लावणारी अर्धांगी नाही. किंवा 'आज दाढी नीट झाली नाही, तेव्हा 'ती' काय म्हणेल?' असा विचार मनात येऊन आपल्या प्रेयसीबद्दल भीती वाटण्याचीही बोकडाला काळजी नसते ! एकंदरीत दाढी असूनही तिची निगा राखावी न लागणारा बोकड हा प्राणी सुखीच नाही काय ? 

          'दाढी' हा खर म्हटल तर आजच्या युगातील संशोधनाचा ज्वलंत विषय आहे. दाढी हनुवटीलाच का येते, ती कानावर किंवा मानेवर का येत नाही? ती जन्मत:च किंवा एकदम वृद्धापकाळात का येत नाही? एकाचे हृदय दुसऱ्याला कलम करून बसवता येते, त्याप्रमाणे माणसाची वाढलेली दाढी बैलाला किंवा पुरुषाची दाढी वाढवून ती बाईला बसवता येईल का? बोकड आणि मानव ह्या दोघांनाच दाढी का यावी? इतर प्राण्यांनी कुणाचे काय घोडे मारले आहे ! एखाद्या पुरुषाने 'छटाक' दाढी राखल्यावर आपण त्याला 'बोकड' म्हणून संबोधतो, मग बोकडालाही 'माणूस' का म्हणता येत नाही? असे एक ना अनेक प्रश्न ह्या दाढीबद्दल मनात येतात. आजचा तरुण पुरुषवर्ग भरपूर अर्धा-पाऊण तास या दाढीपायी खर्च करतो, किती हा वेळेचा अपव्यय ! याकरता सरकारने एक 'राष्ट्रीय दाढी संशोधन कमिटी' नेमली पाहिजे. या कमिटीच्या सभासदांनी दाढी वाढवलीच पाहिजे, अन्यथा ते बिचारे एकमेकांचीच दाढी करत बसून संशोधन टाळतील. असं नाही होऊ !

          'दाढी' या विषयावर आजतागायत भरपूर लेखन झालेले आहे. 'मला जेव्हा दाढी येते-' ह्या पाच अंकी नाटकापासून ते 'दाढीवाला बोवा' या बालगीतापर्यंत ह्या दाढीने साहित्य व्यापलेले आहे. म्हणून आता दाढीबद्दल लेखन कमी व संशोधन फार झाले पाहिजे, असे मी आग्रहाने मत प्रतिपादन करत आहे.

          परवा एकदा एका भगिनी मंडळात एक पुरुषवक्ता माsरे तावातावाने 'केशभूषा व केसांची निगा' यावर भाषण देत होता. भाषण रंगात आले असतानाच, एका भगिनीचा उद्गार हॉलमधे खसखस पिकवण्यास समर्थ ठरला. उद्गार असा होता- " इश्श्य ! त्याला दाढी तरी नीट करता येते का ? "  म्हणजे बघा, दाढी हा पुरुषांचा विषय ! त्याला हात लावायचे काही कारण आहे का?... "नाही!"असे मला वाचकांकडून उत्तर अपेक्षित होतेच ! पण ते उत्तर चूक आहे. कारण आजचे समान हक्काचे युग ! एखादा डॉक्टर 'स्त्रीरोग-तज्ञ' असू शकतो, एखादी स्त्री मग 'पुरुष-दाढी तज्ञ' का असू शकणार नाही? असूच शकेल ! या विषयात पुरुष-स्त्रिया दोघांनीही अभ्यास करायला काय हरकत आहे ? कारण हा विषय महत्वाचा आहे. यावर संशोधन करणे का आवश्यक आहे, ते मी आधीच सांगितले आहे. शिवाय.....

          नाडीवरून रोग्याची परीक्षा करता येते, काडीवरून डबड्याची किंमत कळते, तशीच दाढीवरून मानवी स्वभावाची परख होऊ शकते ! छत्रपती शिवाजी महाराजांचा (दाढीसह-)चेहरा डोळ्यांपुढे आणा. त्यांच्या दाढीमुळेच  तर चेहऱ्यावर पराक्रमाचे आगळे तेज आपणाला दिसू शकते ना ! दाढीमुळेच त्यांच्या चेहऱ्याला एकप्रकारचा करारीपणा आलेला आहे ना ! तीच जर दाढी वाढवलेली नसती तर ?... खांद्यावर झोळी, हातात मण्यांची माळ, पायात खडावा व काळ्याभोर दाढीमिशांमुळे चेहऱ्यावर आलेला धीर-गंभीरपणा - अशी ही मूर्ती रामदास स्वामींचीच असू शकेल, हे दाढी न फुटलेले बालकही सांगू शकेल ! दाढीमुळे 'गीतांजली'कारांचे स्थान आहे, हे सर्वांना माहित आहे. दाढीमुळे दिसणारा चेहऱ्यावरचा प्रौढ व भारदस्तपणा ह्या नोबेल-पारितोषिक-विजेत्याचे महत्व पटवतो. शेर-शायरी-कव्वाली गाणारे त्यांच्या झुलत्या दाढीनेच आपल्यावर व्यक्तीमत्वाची छाप पाडून जातात. मधूनच दाढी कुरवाळण्याची त्यांची ढब आकर्षक असते.

          दाढी वाढलेल्या माणसाचा नैसर्गिक स्वभाव जसा जाणता येतो, तसाच कृत्रिम दाढीने तो लपवताही येतो. सिनेमातील नायकच आणीबाणीच्या प्रसंगी खलनायकासमोर , खोटी दाढीमिशी लावून नायिकेला पळवून नेतो. हे, शेवटी मारामारी करताना खलनायकाहाती जेव्हा नायकाची दाढी येते, तेव्हा खलनायकाला समजते. तर दाढीचे फायदे-तोटे, तिचे महत्व सर्वानी ओळखले पाहिजे. दाढीच्या आकारावरून मनुष्यातील प्रकार समजतात. इंच इंच(च) दाढी वाढवून एखादी व्यक्ती शून्यात बघत रस्त्यावरून भटकू लागली की, ओळखावयाचे- स्वारी 'नवकवी' दिसत्येय बरे का! सकाळच्या प्रहरी हातात चोपडी घेऊन, गालावरून पुन्हापुन्हा हात फिरवून 'दाढी गुळगुळीत झाली की नाही!' हे पहात सायकलवरून जाणारा 'कॉलेज प्रेमवीर'च असणार ! दाढीच्या इवल्याशा खुंटांचे अधूनमधून दर्शन देणारा कारकून नाहीतर अपयशी प्रेमवीर असतो. तर घाईघाईने चालत मधेच न्हाव्याच्या दुकानात शिरून दाढीवरून एखादा वस्तरा मारून घेणारा एन.सी.सी.चा इन्स्ट्रक्टर अथवा पोलीस असतो !

        तसेच दाढीच्या रंगावरून मनुष्याची मनोभूमिका ओळखता येते. काळीभोर लांब दाढी मनुष्याचा उमदा स्वभाव दर्शवते. काळी आखूड दाढी मनुष्याचे खलनायकत्व, आखडू स्वभाव दाखवते. पांढरीशुभ्र दाढी वैराग्याचे प्रतीक आहे. अशी दाढी असणारे हिमालयावर धाव घेण्यास उत्सुक असतात. 'जग हे असार आहे, मिथ्या आहे' अशीच त्यांची विचारसरणी असते. करड्या रंगाची दाढी वाढवणारे करारी, उग्र व तापट स्वभावाचे भासतात. काळी वस्त्रे परिधान करणारा काळापहाड चिमूटभर काळी वाढवून हिंडू लागला तर, त्याचे इम्प्रेशन आणखीनच वाढेल !

        मिशावर  ताव देऊन बोलणारा आगाऊ मग्रूर गर्विष्ठ वाटतो. तर दाढीवर हात फिरवत किंवा दाढी कुरवाळत बोलणारा विचारपूर्वक व शक्कल लढवून वागणारा असतो. दाढीमुळे शीख व शेख लोक चटकन ओळखता येतात. कारण त्यांची दाढी वाढवण्याची विशिष्ट पद्धत! पैलवानांनी मात्र शक्यतो दाढी ठेवण्याचा प्रयत्न करू नये, विशेषत: फ्रीस्टाईल स्पेशालीस्टानी !कारण उघडच आहे.

        दाढी करावी का करू नये- हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण कुणाला दाढी वाढवावी वाटते. कुणाला आपण स्मार्ट दिसावे म्हणून (स्वत:ची) दाढी (स्वत:च) करावी वाटते. तर दुसऱ्याची दाढी करण्यात धन्यता मानणारेही आहेतच ! दाढी वाढवली तरी तिची निगा ठेवावी लागते व करायची (काढावयाची) म्हटली तरी, यथासांग विधी योग्य                             
हत्यारानीच पार पाडावा लागतो !

        दाढी वाढवली तर होणारा एक फायदा सांगतो. प्रेयसी प्रियकराला 'आपल्या गळ्याची शप्पत' त्याच्यावर जिवापाड प्रेम असल्याची बतावणी करते. तसेच (दाढी वाढलेला) प्रियकर प्रेयसीला समजावू शकतो-"लाडके, खरच माझंही तुझ्यावर या दाढीशप्पत फार फार प्रेम आहे." शिवाय नुसत्या ओक्याबोक्या गळ्यापेक्षा वाढलेल्या दाढीची शप्पत हातालाही चांगलीच जाणवते. तिथे अभिनयाचा खराखुरा आविष्कार दर्शवता येतो !

        दाढी वाढवली नाही तरी, होणारा एक (विनोदीच हं !) फायदा सांगतो. वधुपरिक्षेप्रमाणे वरपरीक्षेत वधु वराची परीक्षा घेऊ शकते. वधू सांगते- " हं ! आता घड्याळाचा गजर होण्याच्याआत तुम्ही चांगली दाढी करून दाखवू शकाल का? " चपळ असेल तर, वर चांगली दाढी करून दाखवू शकेल, पण आळशी वराची मात्र सर्वांच्यासमोर 'बिनपाण्याने' चांगलीच होईल!

        एका गोष्टीचे मात्र मला फार आश्चर्य वाटते. सध्या 'फुकटे युग' चालू आहे ना! अमुक घेतल्यावर, तमुक फुकट मिळते- होय ना ? मग तुम्ही असा बोर्ड कुठल्या न्हाव्याच्या दुकानावर पहिला आहे का हो- "आमच्या दुकानात शंभरवेळा कटिंग करून घेणाऱ्याची, एक वेळ पूर्ण दाढी फुकट केली जाईल!" किंवा, "पंचवीसवेळा दाढी करवून घेणाऱ्याच्या एकवेळ मिशा फुकटात काढल्या जातील !" कदाचित दाढीचे महत्व (-जे तुम्हाला आत्ता समजत आहे !) त्यांना आधीपासून माहित असेल !

        दाढी न वाढवण्याचा दुसरा फायदा पहा. दात तोंडात लपवता येतात, पण दाढी कशी लपवता येईल? म्हणून दाढी वाढवलीच नाही तर, 'दात उपटून हातात देईन'च्या चालीवर, 'दाढी उपटून हातात देईन' अशी धमकी तरी कुणाची ऐकून घ्यावी लागणार नाही !

        दाढीचे महत्व जाणून मी संशोधन करत आहे. एक महत्वाचा शोध (वाचक हो! फक्त तुम्हालाच-) सांगतो. जरा तुमची दाढी- सॉरी हं !- तुमचे कान इकडे करा.  'जे दाढी वाढवतात ते आळशी असतात !' उदाहरणार्थ, पूर्वीचे ऋषी-मुनी यज्ञ व अध्यापन ही कामे एकाच जागेवर बसून करत. तपश्चर्या करत असत, तीही एकाच जागेत ! इतर काही अॅक्टिविटीज त्यांनी केल्याचे तुम्ही कधी ऐकले, वाचले, पाहिले आहे काय? म्हणजेच ते आळशी होते व त्यामुळे त्यांची दाढी वाढलेली असे. दशरथ राजा फक्त शिकारीत निपुण होता. म्हणून त्याची दाढी वाढलेली दिसते. उलटपक्षी दशरथपुत्र राम पहा ! आयुष्यभर त्याने कष्ट केले, राक्षसांचा संहार केला, वनवास भोगला, सीतेचा त्यागही केला! म्हणूनच त्याने दाढी वाढवली नाही. कारण तो  'अॅक्टिव्ह' होता, 'अलर्ट' होता! तसेच भगवान विष्णूचे उदाहरण घ्या- त्याचे हजारो वर्षांचे आयुष्य असंख्य घडामोडींनी भरलेले आहे. नाना अवतार घेऊन, हरतऱ्हेच्या राक्षसांना त्याने ठणाणा करायला लावले! त्याला दाढी वाढवण्यास वेळच कुठून मिळणार हो ? नारदांचा जन्म कळ लावण्यात गेला, त्यांना आपल्या हनुवटीला आलेली कळ कशी सहन करणार ? ह्यावरून माझ्या वरील शोधाचा व्यत्यासही - "जे आळशी असतात, ते दाढी वाढवतात !" आपोआप सिद्ध होतो.

        म्हणूनच आजचा मानव शक्यतो कटाक्षाने दाढी काढतो, ती वाढवण्याच्या फंदात तो पडत नाही. निदान 'आज मी दाढी केली', एवढे सत्कृत्य तो फुशारकीने सांगू शकतो. काही गृहिणींना पतीराजाचे एवढेसे दाढीचे खुंटही खपत नाहीत, त्या आपल्या पतीराजावर चाल करून येतात आणि ओरडतात- "अहो, उठा ! बसलात काय आळशासारखे ? घ्या हे तुमचे दाढीचे सामान आणि करून टाका ती दाढी". आळशी पतिराज कोणत्या गृहिणीला आवडतील बरे?

        एक अपवाद असल्यामुळे, माझा आधी सांगितलेला 'शोध' सिद्ध होतो. तो अपवाद म्हणजे संशोधक ! संशोधक आळशी कधीच नसतात. कितीतरी विषयांवर कितीतरी संशोधकांची कितीतरी संशोधने सतत चालू असतात. मग त्यांना (य:कश्चित अशी ती -) दाढी करण्यास वेळ कोठून मिळणार ? म्हणून बहुतेक संशोधकांची दाढी वाढलेली असते.

       मीही 'दाढी' या विषयावर (हे थोडेफार) संशोधन केलेले आहेच, त्यामुळे मी (स्वत:ची) दाढी करायची विसरलोच होतो बघा! नाहीतर माझी 'छोटीशी दाढी' पाहून मला आळशी कारकून किंवा आळशी प्रेमवीर समजाल ! या  दाढी-शपथ मी तसा नाही हो !
.    
           
                    

झोप

        
    मनुष्याला एक वेळ 'लॉटरी' नाही लागली तर चालेल, परंतु 'झोप' ही काही काळ तरी लागलीच पाहिजे !झोपेशिवाय मनुष्य म्हणजे लगामाशिवाय घोडा ! मनुष्ययंत्रणा व्यवस्थितरीत्या चालावयाची असल्यास त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. झोपेमुळे या आवश्यक विश्रांतीची निकड भागविली जाते.
          'झोप' ही मनुष्याला, तसेच इतर प्राणीमात्रांना आवश्यकच आहे. पाणवठ्यावर म्हशी, डोळे मिटून डुलक्या घेतात. गोठ्यामधली जनावरे कडबा खात झोपतात का झोपेतच कडबा खातात, हे आपल्याला ओळखता येत नाही. शाळेमध्ये कित्येकदा शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नास 'झोपेत' उत्तर देणारा विद्यार्थी आढळून येतो !  
          परवा मी एका मित्राकडे फिरत फिरत गेलो होतो. वेळ अर्थातच सायंकाळी सहाची ! त्याच्या घरात पाऊल टाकताच विमानाची घरघर ऐकल्यासारखी वाटले. पण नीट लक्ष देताच आढळून आले की, मित्रमहाशय घशाची विचित्र हालचाल करत तोंड 'आ' वासून निवांत घोरत झोपलेले आहेत ! त्या उघड्या पडलेल्या तोंडातून डासोबांची ये-जा बिनदिक्कतपणे चालू होती, तरी झोपी गेलेला तो मित्र जागा होत नव्हता ! काय ही झोपेची किमया !
          सर्वत्र छापून येणारा एक विनोद छान आहे.
एक साहेब एका कारकुनास विचारतात-
"काय हो गुंडोपंत, आज ऑफिसला उशीर केला ?"
त्यावर पंत उत्तरतात -
''सर, आज घरी उठायला उशीर झाला झोपेतून !"
पुन्हा साहेब 'हा हा' करून दाताड विचकून उद्गारतात -
"म्हणजे तुम्ही 'घरी'देखील झोपता वाटते !"
         
          ज्यांना घरी झोप येत नाही, असे कितीतरी लोक खास झोप घेण्यासाठी नाटक-सिनेमा पहावयास आलेले आढळतात. अलीकडील काळात काही 'संगीत नाटके' केवळ झोपेसाठी निर्माण झाल्याचा बराच बोलबाला आहे ! झोप येण्यासाठी गोळ्या गिळणाऱ्या पेशंटची कीव करावी तेवढी थोडीच ! कधीमधी गोळ्या प्रमाणाबाहेर घेतल्यास त्या अपायकारक ठरतात. त्यापेक्षा गावात होणारी संगीत नाटके, भिक्कार सिनेमा पाहणे अधिक गुणकारी ठरेल ! त्यामुळे टाईमपास होतो, करमणूक होते व शांत झोपही येते. संगीत नाटकातील गायकनटाच्या 'अsss'बरोबरच आपल्याला जांभईचा 'आsss' करण्यास परवानगी मिळते ! मला तर वाटते, झोप न येणाऱ्याना 'संगीत' नाटके ही पर्वणीच वाटत असावी ! अशा नाटकामुळे थेटर चालकांचा, नाट्यसंस्था चालकांचा व झोपेच्या गोळ्या घेणाऱ्याना संभाव्य मृत्यू टाळण्याचा फायदा- वगैरे फायदे होतात ! शिवाय थेटरमधील सर्व प्रेक्षक कंटाळून झोपले की, नाट्यसंस्था चालक (-स्वत:ही झोपले नसल्यास!) त्याच रात्री दुसऱ्या प्रयोगासाठी दुसऱ्या गावी रवाना ! पहा- झोप कुणाची फायदा कुणा !!

          'झोप' ही आवश्यक आहे , तितकीच महत्वपूर्ण आहे ! आपल्या देशाचे माजी पंतप्रधान नेहरू-शास्त्रीजी यांनी आपल्या जीवनातील कामकाजात, रोज चार तास का असेनात पण, झोपेसाठी राखून ठेवले होते. आपण तर नेहमीच झोपतो. भाषणगृहात भाषण चालू असताना श्रोते झोपतातच, पण अध्यक्षमहाशय देखील दोन चार डुलक्या घेतात ! ईश्वराने सर्व प्राणीमात्रांसाठी झोप निर्माण केलीच नसती, तर सगळीकडे हाहा:कार माजून सर्वांच्या डोळ्यावरील झोप अक्षरश: उडाली असती ! परंतु ईश्वर दयाळू (-व आपण सर्व झोपाळू!) आहे म्हणून ठीकय ! एरव्ही गोगलगाय म्हणून 'समजली' जाणारी स्त्री देखील पुरेशी झोप न मिळाल्यास 'दे माय धरणी ठाय' करून सोडते ! महात्माजी, नेपोलियन वागैर्रे व्यक्तींनी तर झोप अगदी हुकमी बनवली होती, ती उगाच का ! पुढारी लोक संधी मिळताच जशी 'इस्टेट' बनवतात, तसे ते सभागृहात चर्चेच्यावेळी , संधी मिळताच तासनतास झोप घेतात !         

          झोप आहे म्हणून जीवन आहे ! हे जीवन आपल्याला मुम्बईच्या फूटपाथवर मध्यरात्री दोन-तीन तास पसरलेल्या पथाऱ्याकडे पाहिल्यास दिसते. मनुष्य कितीही उद्योगी असला, अंतराळात जरी पोहोचला तरी, जगण्याइतकीच झोपेची काळजी त्याला घ्यावी लागते !गृहिणी पाकशास्त्रात कितीही पुढे गेली तरी तिला 'झोपेचे खोबरे' केलेले कधीच आवडणार नाही ! 'झोपेसाठी जीवन आहे का जीवनासाठी झोप आहे ?' या कूट समस्येचे उत्तर आपल्या नेत्यांकडे पाहिल्यास कळून येते. दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींबरोबरच अंतर्गत कलहांमुळे देशात पडत चाललेली फूट जाणवूनही हे नेते स्वस्थपणे 'झोपलेले' आढळतात !
          बसल्याजागीच झोप घेणाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! महागाई, संप, दंगल या सर्व कटकटीपासून अलिप्त राहून दोन क्षण सुखाने जो विश्रांती  घेऊ शकतो, तोच खरा 'मानव' समजावयास पाहिजे !
          एका मोठ्या अपघाताची माहिती समजावी म्हणून, एस. टी.च्या प्रवासात मी (फुकट्या-) सहप्रवाशास माझ्या हातातील 'समाचार'पत्र घेऊ दिले . बराच वेळ झाला तरी तो सहप्रवाशी 'समाचार' परत करीना, म्हणून त्याचा यथेच्छ समाचार घेण्याचे ठरविले. पण कसचे काय नि कसचे काय ! 'समाचार'मधे तोंड खुपसून बसलेले सदर महाशय ऐकण्याच्या स्थितीत होतेच कुठे ! वृत्तपत्राची ढाल पुढे करून ते केव्हाच निद्रादेवीला शरण गेले होते !

         झोपेचे खरे महत्व जाणले एकाच बहाद्दराने ! सतत सहा महिने झोप घेणाऱ्या 'कुंभकर्णा'स कोण बरे विसरेल ? निद्रादेवीचा असा सच्चा उपासक या भूतलावर एखादाच जन्मतो !
          'झोपेसाठी जीवन' हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे ! कंटाळा आलेला 'बॉस' विरंगुळ्यासाठी लेडी-टायपिष्टबरोबर केबिनमधे बसून गप्पा मारतो, मग इतर लेखानिकानी काय फायलीशीच गप्पा मारत बसावे का ? तेही बिचारे विरंगुळा म्हणून सुखाचा 'मूलमंत्र' जपतात ! झोपेतून उठल्यावर आळस जातो, कामाला हुरूप येतो ! भगवान श्रीकृष्ण झोपेतून जागे झाल्यावर दुर्योधनास यादवसैन्य मिळाले व अर्जुनाला विजयच मिळाला !

          सर्वानी आपल्यापुढील कटकटी मिटवण्यासाठी 'झोपे'चा मार्ग अवलंबावा ! कुणालाच प्रमोशनची काळजी नको. (पडेल-)उमेदवारांना डिपॉझीट परत मिळवण्याची काळजी नको, तर विद्यार्थ्याना पास-नापासाची (व नापास झाल्यास आत्महत्येची) काळजी करावयास नको ! शिवाय झोप म्हटली की स्वप्न आलेच ! मग स्वप्नात आपल्याला कल्पवृक्ष गवसतोच  !   
         
          'झोप' हा करमणुकीचाही विषय आहे ! झोपेत चालणारी व्यक्ती, झोपेतच हातवारे करून बडबडणारी व्यक्ती- हे किस्से पाहिले की, मनोरंजन (खरोखरचे- टीव्हीवरचे नाही !) होते ! वडीलमाणसे काम सांगू लागली की, डोळे किलकिले करत झोपेचे सोंग घेणाऱ्या लहान मुलांची 'गंमत' कधी पाहिली का ? डोळे सताड उघडे ठेवून 'झोपणारी' माणसेही करमणुकीचा विषय होतात.

          मानवाच्या 'झोपे'वर इतर काही प्राणीमात्रांचे जीवनदेखील अवलंबून आहे ! आपण झोपलो की, 'उंदीर' या प्राण्याला जाग येते ! आपण 'झोपतो', म्हणून ढेकूण 'जगतो' असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती होणार नाही !    

          आपण दुपारी झोपल्यानंतर जी 'वामकुक्षी' घेतो, ती आरोग्यास आवश्यक अशीच झोप आहे ! 'झोप' हे संमोहनशास्त्र आहे. जगाच्या विनाशास्तव पुढे धावणाऱ्या अणुशास्त्रज्ञांनी याचाच उपयोग करावा ! दुसऱ्यांना जे जास्त 'झोप' घेऊ देतील, तेही निश्चित आघाडीवर जातील.

          स्वत: थोडीशीच झोप घेऊन, शत्रूला युद्धभूमीवर 'कायमची झोप' घेऊ देणाऱ्या आपल्या जवानांचे स्मरण चिरकाल राहणारच आहे ! 'झोप' या अस्त्राचा उपयोग जो अचूक करतो, तो जीवनात यशस्वी ठरतो. जो अयशस्वी ठरतो, त्याला मग काळझोपच पत्करावी लागते !

          म्हणून प्रपंचाच्या जंजाळातून मुक्त होण्यास, भरपूर आराम करण्यास, आपसातील यादवी मिटवण्यास 'झोप' हा एकच अत्युत्तम इलाज आहे ! निरनिराळ्या विद्यापीठातून, सध्या चालू असलेल्या 'प्रात्यक्षिका'व्यतिरिक्त, 'झोप का व कशी घ्यावी''झोपेचे फायदे-तोटे' वगैरे विषयांवरील अभ्यासक्रम  शिकवावेत. त्यात जे विद्यार्थी नैपुण्य दाखवतील, त्यांना 'झोपार्थी' 'प्रति कुंभकर्ण' 'झोपसम्राट' वगैरे 'पदव्या' बहाल कराव्यात ! अशाप्रकारचे अभिनव उपक्रम सुरू केल्यासच विद्यापिठाना 'जाग' येईल ! ह्या अभ्यासक्रमात पुरातन कालापासून झोपेसाठी उपयोगात आणलेली 'अंगाईगीते' ही गाईड्स म्हणून वापरण्यास हरकत नाही. ('भूपाळ्या'वर सरकारने बंदीच घालावी !)

          हल्ली तर म्हणे संशोधक 'झोपेत शिक्षण घेण्याचे शास्त्र' शोधू पहात आहेत ! म्हणजे मनुष्य एकंदरीत प्रगतीपथावरच आहे- झोपेतही ! असे असताना 'जागे व्हा ! जागे व्हा ! पुढे चला !' असे कंठरवाने ओरडून सांगणाऱ्याना काय म्हणावे !

          मी तर झोपेत 'झोपलास तर जागलास, जागलास तर मेलास !' हाच अद्वितीय संदेश पाठ करत असतो . कारण त्याशिवाय गाढ झोप येतच नाही !
        वाचकहो ! हे लिहितानाच किती झोप येऊ लागली हो ! हा लेख वाचून तुम्ही तर नक्कीच छान पेंगणार- तेवढाच तुम्हाला विश्रांतीचा चानस !      

          (ता.क.- संपादक महाशयानी आपल्या कार्यालयात दिवसा जागरण करून, अस्मादिकांचा लेख छापल्याबद्दल, आssss भार !) 

जावई

        
            माझे मित्र जर तुम्हाला कधी भेटलेच व माझा विषय निघाला, तर ते माझ्याविषयीची एक आख्यायिका जरूर सुनावतील. ती अशी:
          एकदा बंडूचे (-म्हणजेच अस्मादिकांचे!)मामा बंडूघरी (बंडूच्या घरी = षष्ठी तत्पुरुष ) आले होते. त्यावेळी बंडू सात वर्षांचा होता. मामा बंडूच्या वडिलांबरोबर गप्पा मारत बसले होते. एका खुर्चीवर बसून बंडू 'या बाई या' या कवितेचा अभ्यास करीत होता. एकाग्रचित्त झालेल्या अशा आपल्या भाच्याचे कौतुक वाटून, मामाने बंडूला विचारले-
"काय पंत ? मोठेपणी कोण होणार तुम्ही ? "
"जावई !!" एका क्षणाचाही विलंब न लावता 'पंता'नी आपल्या उत्तराने मामासाहेबांच्या प्रश्नाला पार सीमापार टोलाविले . भाच्याच्या 'विनोदी' उत्तराने खूष झालेले मामा इतके हसू लागले की, त्यानी अडकित्त्याने कातरत असलेल्या सुपारीऐवजी जेव्हा बोटाचा तुकडा पडून रक्त पाहिले, तेव्हा कुठे ते शुद्धीवर आले !

          आता ही आख्यायिकाच असल्याकारणाने तीमधील खरेखोटेपणा सांगणारे व ऐकणारेच जाणोत ! परंतु माझ्या उत्तराबद्दल मला काहीच हास्यास्पद वाटत नाही. अहो, प्रत्येक जन्मलेले मूळ हे भावी सासऱ्यासाठीच जन्मलेले असते. प्रत्येक मूळ हे जन्मत:च 'जावई' म्हणून अस्तित्वात येते. एवढेच की, त्याला जावयाचे 'सर्टिफिकेट' मात्र काही ठराविक काळानंतर मिळू शकते.

          'जावई' या शब्दाने हसू येणाऱ्या मामासाहेबांना जर एखादी कुरूप मुलगी असती, तर मग त्या शब्दाने आपले सामर्थ्य व्यक्त करून चांगलेच रडविले असते ! एवढा मोठा 'मोगले-आझम' अकबर बादशहा सर्व जावयांना (-जावयानाच ना नक्की ! नाही, आमचा इतिहास विषयाचा अभ्यास केव्हाच 'इतिहासजमा' झाला आहे, म्हणून विचारलं !) सुळावर द्यावयास तयार झाला होता; परंतु जेव्हा त्याला आपणही एक 'जावई'च आहोत, हे समजले - तेव्हा त्याला झालेला आनंद काय वर्णावा महाराज ! त्याने आपला हुकूम मागे घेतला; कशासाठी माहित आहे ? तर आपले 'जावईत्व' टिकवण्यासाठी !

          'जावई' या शब्दाचा महिमा फार अगाध आहे. सासऱ्याच्या घरच थोडं राहिल्यावर, जास्त करण्यासाठी घोडं धाडणारा जावईच असतो ना ! दिवाळसणाला मोठ्या निग्रहान सासऱ्यांच्या आग्रहाला मान देऊन घड्याळ-अंगठी घेण्यासाठी त्याच्या गृहात प्रवेश करणारा जावईच असतो ना ! सतत दीड तपं डोळ्यात तेल घालून मुलीची 'राखण' करण्याच्या कामातून सासऱ्याची सुटका करणारा तरी कोण ? जावईच ना!
ज्याच्या आगमनाने सारी 'सासरनगरी' आनंदित, प्रफुल्लित होते, तो कोण ? जावई !! भरपंक्तीत आग्रह करून साजूक तुपाची धार जी सासू 'एका'च्याच पानातील भातावर सोडते, टी कुणासाठी ? तर खास जावयासाठीच ! 'जावई-पुराण' वाढवावे तितके लांबते .

          आमच्या शेजारी दोन घरे सोडून पलीकडे आबासाहेब राहतात. आबासाहेब ही मोठी विनोदी वल्ली बरं ! केव्हा काय बोलतील याचा नेम नाही. परवा मी सहज त्यांच्या घरी गेलो होतो. तर स्वारी चिंताक्रांत असल्याची दिसली. मी विचारलं - "काय आबासाहेब, कसली काळजी ? " तसे ते उत्तरले- "अरे बंडू, सरकारने मुलीच्या विवाहाची मर्यादा अठरावरून सोळावर आणली ना ! अजून दोन वर्षांनी मी 'जावई माझा भला' म्हणणार होतो,  मला आता  यंदाच 'जावई माझा आला' म्हणत बसावे लागणार, नाही का ! माझी हसून पुरेवाट झाली.

          प्रत्येकाला (मनातून-) वाटतच असते की, एकवेळ आपल्याला मुलगी नसली तर चालेल, पण चांगल्या वरिष्ठ पदावर आरूढ असलेला ऑफिसर 'जावई' पाहिजेच ! पायात पॉलिश नसलेले बूट टक टक वाजवत आपला जावई ऑफिसला निघाला की, सासूबाईला जावयावरून मीठ-मोहऱ्या उतरून टाकाव्याशा वाटतात !

          'जावाईशोध' हा प्रसंग तर कोलंबसच्या 'अमेरिका शोधा'पेक्षा अद्भुतरम्य प्रकार असतो. एखाद्या मुलीचा बाप जेव्हा काखोटीला कुंडल्या, पत्रिका, पत्ते (-स्थळांचे, खेळायचे नव्हेत !) वगैरे घेऊन हिंडतो, तेव्हा मला त्या बापाचे भारी कौतुक वाटते. तो बाप 'डिटेक्टिव्ह धनंजय'च वाटतो . जेव्हा 'जावई मोठा गुणी मिळाला हं !' असे उद्गार एखाद्या सासू-सासऱ्यापुढे आले म्हणजे त्यांना 'जावई -शोधा'चे सार्थक झाल्यासारखे वाटत अईल !

          कितीही गरीब असला तरी सासूला आपला जावई श्रीमंतच वाटतो. आमच्या समोरच्या घरात राहणाऱ्या पुष्पाबाई नेहमीच सांगतात, 'आमचे जावई अगदी हुशार डॉक्टर आहेत हं!' वास्तविक त्यांचे जावई एक कम्पौंडर आहेत ! प्रभाकरराव सर्वाना आपणहून सांगतात- "आमचे पंत (म्हणजे त्यांचे जावई- मी नव्हे हं !) लाखात एक ! माणासांची खूप कदर आहे हो त्यांना !"

          प्रभाकररावांचेच सांगणे कशाला पाहिजे ? तुम्ही सर्व सासऱ्यांची एक 'श्वशुरसभा' घ्या आणि विचारा की कुणाचा जावई वाईट आहे ? छे ! नावच नको ! तुम्ही (-तुमच्याजवळ नसलेले) एक लाख रुपये द्यायला तयार झालात तरी जावयाच्या नावाने 'ब्र'ही उच्चारणारा सासरा मिळणार नाहीच !

          जावयाची किंमत गुणांनी, पैशाने सर्व गोष्टीनी होते. जगाच्या बाजारपेठेत सोने एकवेळ फुकट वाटलेले आढळेल, साखर पुन्हा स्वस्त झालेली दिसेल, परंतु जावई असातसा मिळू शकणार नाही. अहो, भाव आहे म्हणूनच जावई काळ्या- बाजारात बसू शकतो, कारण सध्या हुंडाबंदी आहे म्हणे ! तरीही सासरेलोक गुपचूपपणे दहापाच हजार जास्त द्यावयास तयार होतातच ना जावयांना ! कारण 'जावई' ही काही वाटेवर कुठेही पडलेली वस्तू नाही , कुणीही यावे व तिला उचलून घ्यावे ! त्यासाठी स्थळ काळ वेळ इत्यादि गोष्टींचाही विचार करावा लागतो.

          जावईलोकांचे बोलणे नेहमी विनोदी असते, अशी माझी (अर्थात प्रामाणिकच) समजूत आहे. कारण माझा एक विवाहित मित्र आहे, तरी तो मला 'विनोदी' म्हणून परिचित नाही. पण तो त्याच्या सासऱ्याशी बोलू लागला, म्हणजे त्यांना तो फारच विनोदी वाटतो- मग तो काहीही बोलू दे ! मित्राच्या घरी एकदा भांडण झाले नि काहीतरी बिनसले. तो चक्क 'सासरे गाढव आहेत' असे म्हणाला. केवढे हे धाडस ! दुसरे दिवशी स्वत: सासरे एकापाशी बोलताना आढळले- "आमचे जावई फार धाडशी हं ! असे धाडस अंगी हवेच !" त्या मित्राबद्दल माझा आदर आणखीनच दुणावला.

          जावयाचा स्वभाव थोडा बालिश असतो. त्यामुळे तो प्रसंगी लहान मुलासारखा अडून बसतो, हट्टी बनतो नि मग त्याची समजूत काढता काढता, बिचारी श्वशूरमंडळी बेजार होतात. मग अशावेळी -" हे काय जावईबापू , असा त्रागा करू नका ! हवे तर घड्याळ (-अथवा इतर तत्सम वस्तू) घेऊन येतो, पण हट्ट सोडा !" अशी मनधरणी केल्यानंतर, थोडा 'खाऊ' देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जावई 'माणूस' बनतो!

          जावई मिळण्याचे भाग्य सर्वांनाच लाभते अस नाही . पण असे हतभागी फारच थोडे! तर कित्येकांना जावई-भांडारच उघडावे लागते. जावई ही आपल्या मुलीचा यथायोग्य सांभाळ करणारी सन्मान्य व्यक्ती असते, अशी सासऱ्याची भावना असते. तर सासूच्यामते 'जावईबापू ' ही व्यक्ती म्हणजे आपल्या मुलीच भाग्य थोर म्हणून मिळणारी ! एकंदरित काय, तर जावईलोकांचच नशीब थोर म्हणून त्यांना भाव येतो , त्यांच्या हौशी पूर्ण होतात, आणि त्यांना पुढे कधीतरी सासरा होण्याचेही   भाग्य प्राप्त होते !

          'जावई' ही व्यक्ती समाजात फार मोठे स्थान मिळवून, टिकवून आहे. 'हा अमक्याचा जावई ' म्हणवून घेताना आपल्या सासऱ्याचेही नाव उज्ज्वल करणारा जावई खराच थोर नाही काय ? जावयाबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेमुळेच 'जावई माझा भला' 'जावयाचे बंड' वगैरे साहित्य-नाट्य-सिनेसृष्टीत तो हिंडू शकत आहे.

          अरे हो ! जावयाच कौतुक सांगता सांगता मी एक गोष्ट विसरलोच की ! कोणती म्हणून काय विचारता ? अहो, आता काही काळानंतर आषाढ महिना सुरू होईल ना !
मग ?
अरेच्चा ! 'मग' म्हणून काय विचारता मला ?
तिकडे आमच्या सासूबाई 'आखाड' तळून ठेवतील, तो खायला मी जाणार नाही, तर कोण तुमचा जावई ?
बराय, सासुरवाडीकडे आताच निघतो तर !!
.               

भाजी

    
       'भाजी आणणे' हा सर्वात बिकट प्रश्न होऊन राहिला आहे आमच्यापुढे आज ! कोणतीही महिला उठते व पुरुषवर्गाने आणलेल्या भाजीवर सडकून टीका करते. त्यामुळे टीका करावयाचा एकही विषय त्यानी शिल्लक ठेवला असेलसे वाटत नाही.

          महिला वर्गाचे वैशिष्ट्य हेच बनले आहे की, भाजी शिजवता न का येईना नीट, परंतु पुरुषांनी चांगलीच भाजी मंडईतून आणली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो ! स्वत: मंडईतून भाजी आणणे तर दूरच राहिले, परंतु आणून दिलेली भाजीही मुकाट्याने गिळून टाकली जात नाही. वास्तविक भाजी निवडण्याचे कामही पुरुषांचे नाही, परंतु महिलांनीच 'भाजी आणणे' हा पुरुषांचा 'साईड बिजिनेस' बनवला आहे.त्यामुळे सायंकाळी हपीसातून येता येता किंवा सकाळी धोब्याच्या दुकानातून चक्कर टाकून वाटेतल्या  मंडईतून भाजी आणण्याचे दिव्य पुरुषांनाच करावे लागते !

          'अमकीच्या नवऱ्याला साधी तमकी भाजीही आणता येत नाही-' असा शेरा मारूनही वनिताविश्वात एकमेकींच्या नवऱ्याचा मोठेपणा आजमावला जातो ! ह्या गृहिणींचा खचितच असा समज झालेला असावा, नवऱ्याला हपिसात पगार मिळतो तो भाजी उत्तम आणण्याबद्दलच !

          मंडईत जाऊन भाजी आणणे व तीही अगदी उत्तम, ताजी, स्वच्छ अशी ; हे खर म्हणजे ज्या पतीराजाला जमते, त्याची 'आदर्श पतिराज' म्हणून संभावना करण्यास काहीच हरकत नाही ! जो गृहिणीच्या सल्ल्याबरहुकूम  भाजी आणून हजर करतो, तोच घरसंसार उत्तम चालवतो, असे खुश्शाल समजावे. अस्मादिकांना मात्र या जन्मी हे भाजी आणण्याचे कार्य कुशलतेने पार पाडता येत नाही, हे सांगण्यास आम्हाला फार खेद होतो.
          पुष्कळदा वाटते की, 'कुटुंबा'ने सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी हवी असलेली भाजी आणून 'कुटुंबा'स चकित करावं ! पण होत काय की, मी मोठ्या अशा प्रचंड मंडईजवळ जाताच, दक्षिणा उपटणाऱ्या बडव्याप्रमाणे समस्त भाजीवाले चढाओढीने ओरडू लागतात. सगळेचजण आपली भाजी 'फस्कलास''बेष्टपैकी' असल्याची ग्वाही देऊ लागतात. माझ्या दोन कानावर सतराशेएकसष्ट भाज्यांची नावे, रटाळ वक्त्याच्या अंगावर कोसळणाऱ्या नासक्या अंडी-टोमाटोप्रमाणेच आदळू लागतात. या गोंधळातच मी घरी आणावयास सांगितलेल्या भाज्यांची नावे विसरतो. शेवटी 'ही घेऊ का ती घेऊ'च्या गडबडीत मी छान-छान फुले आलेली मेथीचीच भाजी पसंत करतो !

          पण घरी या भाजीचे चांगले स्वागत व्हावयाचे नावच नको ! 'फुलं आलेली भाजी कोथिंबीर कध्धी आणू नका, म्हणून हज्जारदा सांगत्ये ! पण टाळकं कधी ठिकाणावर येणार देव जाणे !' हे स्वगत भाषण कानावर जोराने आदळते. मंडईत भाजीवाले व घरात आमचे 'कुटुंब' यांचा आरडा ओरडा ऐकण्याखेरीज माझ्या कानात दुसरे काही शिरत नाहीच ! उगीच नाही अभिमन्यू भाजीमार्केत सोडून चक्रव्यूहात पळाला ! 'स्त्रियांना फुलांची आवड असते' असे सांगणाऱ्या महाभागाच्याच शोधात आहे मी !

          मार्केटात भाज्यांवर लेबले असतील तर शपथ ! आम्ही आणलेली मार्केटातील अंबाडीची भाजी कधी पालकाची भाजी बनते घरी येताच, तर पालकाची म्हणून आणलेली नेमकी चुक्याची पेंढीच निघते. तीच गत गवार, मुळे, मूग, घेवडा यांच्या शेंगांची ! अहो मी तर एकदा कमालच केली (-असे 'कुटुंब' वदति ). मला 'कोणत्याही शेंगा' भाजीसाठी आणायला सांगितल्या. मी मंडईत गेलो व सरळ एक किलो 'भुईमुगाच्या शेंगा' घरी आणल्या. यात माझ कुठ चुकल ? पण त्या दिवशी 'कुटुंबा'न आकाशपाताळ एक केलं पहा !

          फ्लॉवर, नवलकोल, कोबी या भाज्यांच्या बाबतीतही नेहमीच बोंब ! यासाठी प्रत्येक भाजीवाल्याने आपल्या भाजीवर लेबल लावावेच, असा यूनोने ठराव पास केला पाहिजे ! प्रत्येक भाजी आढी शिजवूनच मग शिळी किंवा ताजी आहे ते तपासून विकण्यास मंडईत ठेवावी. कारण विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण मी मंडईतून आणलेली पाणीदार वांगी शिळीच निघतात. भेंड्या किडक्या असतात. मुळ्यात अळ्या शिरतात व कारली कडूच बनतात !

          असे होऊ नये म्हणून मी पूर्वी त्या त्या भाजीतील 'स्पेशालिष्ट' मित्रास बरोबर नेत असे. परंतु प्रत्येक वेळी मित्रास भजी खाऊ घालणे खिशास परवडेना ! (त्या काळात 'आघाडी'वर तात्पुरती शांतता राखण्यात मी यशस्वी ठरलो होतो!) मग तोही नाद सोडून दिला.

          साध्या कोथिंबिरीच्या बाबतीत माझी नेहमीच रड असते ! पुष्कळजण रुपयाची भाजी घेऊन भांडून दोन पैशाची कोथिंबीर फुकट उपटतात ! पण मी जेव्हा अठ्ठ्याण्णव पैशांची भाजी घेऊन कोथिंबिरीची फुकट मागणी करतो, तेव्हा त्या गडबडीत नेमके राहिलेले दोन पैसे मागण्यास विसरतोच!

          हल्ली मी भाजी आणतही नसतो व खातही नसतो . याबद्दल 'कुटुंबां'ने शेजारच्या दोन मावश्यांकडे तक्रारअर्ज नेला. पण तो बहुमताने केराच्या टोपलीत टाकला गेला. कारण दोन्ही मावश्यांचे उत्तर असे आले- "अहो, आमचे 'हे' देखील भाजी आणतच नाहीत, मग ती खाणे तर दूरच राहिले!" (सगळे 'हे' झिंदाबाद !)

          सकाळी-सायंकाळी काही व्यक्ती मंडईतून जेव्हा मजेत हसतखेळत हातातील हरतऱ्हेच्या भाज्यांच्या पिशव्या घेऊन चाललेल्या दिसतात, त्यावेळी त्या आदर्श पतीराजांकडे पाहून मी मनात मनोभावे नमस्कार करीत असतो ! त्या व्यक्तीना 'भाजी आणण्या'चे जे बाळकडू मिळालेले असते, त्याचा मला हेवा वाटू लागतो.

          एवढे मात्र निश्चित की भाजी आणणे मला जमले नाही, यात माझा काहीच दोष नाही . भाजी आणणे ही एक कलाच आहे (-बहुधा पासष्टावी !). शाळेत फक्त "भाजी कसली खावी व का खावी ?", याचेच ज्ञान प्राप्त होते. मग भाजी आणण्याचे शिक्षण केव्हा कुणाला मिळणार ? श्वेतपत्रिकेत देखील कुणी "भाजी कशी आणावी ?" या विषयाकडे लक्ष दिलेले दिसत नाही.

          भाजीबद्दल मी एकाच बजावून ठेवतो- 

" सातासमुद्रापलीकडे जाऊन गुलबकावलीचे फूल आणावयास मला एकवेळ जमेल, पण सात पावलांवरील मंडईतून कोबीचे फूल चांगले बघून आणणे काही आपल्याला जमणार नाही बुवा ! "
.                   
       

बाळाची शर्यत- (बालकविता)


एक दोन एक दोन
बाळाची पावलं
मोजणार कोण . .

तीन चार तीन चार
बाळाच्या पैंजणाचा
नादच फार . .

पाच सहा पाच सहा
बाळाची दुडुदुडु
ऐट किती पहा . .

सात आठ सात आठ
बाळाने धरली
ताईची पाठ . .

नऊ दहा नऊ दहा
बाळाने शर्यत
जिंकली पहा . .
.

फेसबुकमाहात्म्य... तो ......आणि आत्मचिंतन -


घरी अभ्यास मन लावून केला नाही
शाळेत नंबर वर आणला नाही
वर्गात मॉनेटर होऊ शकला नाही
बायकोवर डाफरल्याशिवाय दिवस गेला नाही
स्वत: एकही नोकरी टिकवू शकला नाही
नोकरीत काम कधी नीट जमले नाही
बॉससमोर तत पप शिवाय बोलला नाही
कुणाला मदत कधी करायला गेला नाही
गल्लीत शेजारीपाजारी हिंडला नाही
चारचौघात ओळख देऊ शकला नाही
समाजात कधी मिसळला नाही
सोसायटीत कधी निवडून येऊ शकला नाही ...

फेसबुकाचे फुकट व्यासपीठ मिळाल्याबरोबर मात्र -

तो शहाणा-
सगळ्या जगालाच,
त्या अरविंद केजरीवालने -
"असे करायला पाहिजे होते..."

 "तसे वागायला पाहिजे होते...."
असे छातीठोकपणे सांगत सुटतो !
.

ये रे माझ्या मागल्या -


सकाळी सकाळीच बायकोने माझ्या तोंडावरचे पांघरूण खसकन ओढले -

काहीही हालचाल न करता,
मी तसाच निवांत पडून राहिलो ...

कालच्याच तारस्वरात बेंबीच्या देठापासून गरजत ती ओरडली -
"अहो, पसरलात काय इतका वेळ ?
नाष्टा नाही तर नाही....
आज चहाची पण तयारी अजून केलीच नाही का ? "

पांघरूणातून डोके बाहेर काढत,
मी डोक्याखाली दोन्ही हात ठेवून शांतपणे उत्तरलो -

" उगाच डाफरायच काम नाही हं !
कालच्या विशेष दिनानिमित्त,
मी तुला दिवसभर डोक्यावर घेऊन नाचलो-
म्हणून आजही तसेच करीन वाटले का !
नीट ध्यानात ठेव.. आता एकदम पुढचाच आठ मार्च ! "

- पुन्हा मी एकटा पांघरुणात गडप !
.

होऊ कसा उतराई -


आजच्या विशेष  महिलादिनी
तुझ्यासाठी मी आपणहून
चहाचे पातेले
ग्यासवर चढवताना -

तुझ्याशी वर्षात एकदा
आज मोकळ्याढाकळ्या
गप्पा मारता मारताना ....

तुझ्या ष्टाईलने
ऐटीत पातेले पट्कन
खाली उतरवताना ..

चुकून नकळत
स्स्सस्स्सsssss आवाज
माझ्या तोंडातून बाहेर पडताना -

जोरदार चटका
माझ्या बोटांना
.... आणि तुझ्या डोळ्यात
पाणी घळघळ पाहताना .. !

शब्दच अपुरे आहेत ग -
व्यक्त कसा मी होऊ !
.

वरात


सात पावलांची साथ
जन्मजन्मांची गाठ

एकमेकांची समजूत
संकटात एकजूट

हेवेदावे ना कधीच
ईर्ष्याद्वेष ना कधीच

रुसवेफुगवे ग क्षणांचे
एकमेकांत गुंतण्याचे

तुझ्या डोळ्यातले पाणी
माझ्या मनाला टोचणी

माझे कष्ट उपसणे
तुझे पाठीशी राहणे

हृदय माझ्या शरीरात
प्राणवायूच तुझी साथ

हात धरला हातात
सुखदु:खांची वरात . . !
.

' फेसबुकोपदेश - '


"स्टेटस" जरी टाकला आपण फक्त एक
"वॉल" ती असावी आपली नित्य नेक |

"लाईक" मिळाले जरी फक्त दोन
बदलू नये आपुला कधी दृष्टीकोन |

"कॉमेंट" मिळाल्या जरी मस्त तीन
इतरांना समजू नये तरी हीन-दीन |
 

"शेअर" झाले जरी "पोस्ट"चे चार
जाऊ नये माजून तयाने हो फार |

"ट्याग" जरी दिसले "वॉल"वर पाच
थयथयाट नको, नको नंगानाच |

"कॉपीपेस्ट" केले इतरांनी सहा
समजावोनी सांगावे तयाना पहा |

"अन्फ्रेंड" झाले जरी चुकून सात
पुन्हा "फ्रेंडरिक्वेस्ट" पाठवावी आत |

"मेसेज" आपल्याला दिसले जरी आठ
आवडीचे तेवढे करावे त्यात "च्याट" |

"ग्रुप" जरी दिसले "वॉल"वर नऊ
करू नये- दातओठ गिळू की खाऊ |

"गेम-रिक्वेस्ट" जरी नित्य येती दहा
आवडीचा भिडू त्यात निवडून पहा |

"पोक" आपल्याला मिळाले हो अकरा
चकरा मारून शोधावा आपणही बकरा |

"फेसबुका"त नका वाजवू कधी बारा
आपलेच होतील नक्की तीन तेरा |

.

बघता बघता देवा -


कालपर्यंत कितीतरी
खुषीत तू ठेवलेस -
बघता बघता देवा,
आज मात्र भुईत लोळवलेस . .

हिरवेगार शेत सारे
सोन्यासारखे पिकवलेस -
बघता बघता देवा,
सगळे का रे धुळीत मिळवलेस . .

का रे देवा आम्हाला
इतके तू छळलेस -
बघता बघता देवा,
पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . .

घ्यायचे होते सगळे परत
आधी इतके का दिलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला कफल्लक का केलेस . .

इतके दिवस तुझे
कौतुक करायला लावलेस -
बघता बघता देवा,
आता बोट मोडायला लावलेस . .

खेळ कसला जीवघेणा
पावसाला रे धाडलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला मातीमधे गाडलेस . . !

.

" बाळू - " (बालकविता)


आई म्हणते चिडून रागाने बाळूला,
"बाळू, तुझ्या खोड्या नाकी नऊ आणतात" -
बाळू विचारतो आईकडे पहात,
"तुझ्या नाकावर एकदोन कुठे दिसतात ?"

कामाच्यावेळी आई म्हणते बाळूला,
"कळतच नाही घड्याळ कसे पळते" -
घड्याळाकडे पहात बाळू म्हणतो,
"पळत नाही ते, आहे तिथेच दिसते !"

आई म्हणते बाळूला दुपारी जेवल्यावर,
"बाळू, जरा निवांत पडू दे ना मला" -
काळजीने बाळू म्हणतो आईला,
"आई, पडताना लागेल ना मग तुला !"
.

दहा चारोळ्या ----------

मधुमेही हिसका -
मधुमेह झाला आपल्याला 
हे त्याला समजल्यापासून 
 सावरला नाही तो अजून  
गोड बोलण्याच्या धसक्यातून !
.

स्वच्छता -
मनाच्या काचेवर 
शिंतोडे सुविचारांचे चार -
पुसून टाकता आले 
सगळे सहजपणे कुविचार ..
.

कर्जत-कासारा -
माझ्या नजरेला द्या नजर
जरी पुन्हापुन्हा तू म्हणतेस 
आधी सांग मला खरोखर 
नक्की कुणीकडे तू बघतेस !
.

सुखाचे सोबती -
माझी दु:खं वाटत होतो
एकही याचक दिसला नाही -
सुखं वाटण्या आरंभ केला
एकही दु:खी उरला नाही ..
.

बाटली जुनीच -
मागच्या वर्षीचाच शोधा खड्डा 
वृक्षारोपणास.. नवा कशाला -
उशीर होतो पुढच्या कार्यक्रमाला
घड्याळात पाहत नेता म्हणाला ..
.

जादुई अंगाई -
मिटून डोळे पडलो निवांत 
झोपणे लवकर जमले नाही -
अंगाई आईची आठवत 
कधी झोपलो कळले नाही ..
.

जागरूक -
मी आणि चप्पलचोराने
नवस केला 'जागृत' देवाला 
देव माझ्याआधीच पावला 
'जागरूक' चप्पलचोराला 
.

चिंब चिंब -
मुसळधार पावसाने जरी 
घरातच दोघांना बसवले -
मनातल्या गुजगोष्टीनी 
चिंबचिंब त्यांना भिजवले !
.

आशा -
मुरले आहे दु:ख चांगले
बरणीमधल्या लोणच्यासारखे -
तवंग सुखाचा दिसेल कधीतरी
मनास वाटत आहे सारखे ..
.

पापी पेट का सवाल -
मोजत बसलो असतो मीही 
चंद्रचांदण्या सखीच्यासोबत -
विसरायला तहानभूक, पण 
नाही अन्नाचा कण सोबत ..
.