चोर

           माझ्या लहानपणापासून मला "चोर" ह्या प्राण्याविषयी आदर, कुतूहल, आश्चर्य वगैरे वगैरे आहे. कारणे बरीच आहेत. सर्वाना पटण्यासारखीच आहेत. हायस्कूलमधे असताना 'चोरांचे संमेलन' हा धडाही नजरेखाली घातला. त्यामुळे चोरांची चारित्र्यविषयक माहिती खूप मिळाली. त्यांची कार्यपद्धति, जीवनविषयक दृष्टीकोन मला फारच आवडतात. त्यांची थोरवी, महती वर्णावी तितकी थोडीच !

        चोर ही जात प्रामाणिक आहे. एखाद्या घरात तो शिरला म्हणजे थोडक्या वेळात हाताला येतील तेवढ्याच वस्तू तो लंपास करतो. नसत्या गोष्टीसाठी तो अडून बसणार नाही. तो योग्य हत्यारेच बरोबर नेतो. आपल्या कार्यामुळे इतरांना त्रास, गोंधळ जाणवू नये, याची तो पुरेपूर दक्षता घेतो. एक वेळ एखाद्याच्या घराचे नुकसान झालेले त्याला आवडते, पण आपल्यासाठी घरात निष्कारण गोंगाट झालेला त्याला खपत नाही. मग त्याला हाताशी शस्त्र धरावे वाटते. एरव्ही तो सरकारी धोरणाचा पुरस्कर्ता म्हणजे शांततावादी आहे.


        एखादा मंत्री, पुढारी येणार असल्यास त्याच्या स्वागतासाठी सारी जनता चडफडत का होईना पण धावून येते. तोरणा-पताकांचा अवाढव्य खर्च केला जातो. कारण त्याशिवाय मंत्र्याचे समाधान होऊ शकत नाही ना ! पण जगात "चोर" ही एकच व्यक्ती आहे, जिला हा अवाढव्य खर्च आवडत नाही. सरकारने बँका, तिजोऱ्या वगैरे कशासाठी निर्माण केल्या आहेत ? जनतेने पैसे साठवून ठेवण्यासाठीच ना ! पण जनता अडाणी आहे. ती पैसा साठवतच नाही. त्यामुळे नुकसान किती होते पहा. तोरणा-पताकात निष्कारण पैसा खर्च होतो. जनतेचा पैसा वाया जातो. तो कुणाच्याच पदरात पडत नाही. हाच पैसा अडका गाठोडे, गाडगी, मडकी, तिजोऱ्या, बँकात ठेवला तर किती फायदा होईल जनतेचा ? जनतेला घरबसल्या व्याज मिळू शकेल व वेळप्रसंगी हाच पैसा वाया न जाता एखाद्या चोराच्या जीवनचरितार्थाचे साधन तरी होऊ शकेल की !

                 चोरांचे कार्य हे सत्कार्य आहे. चोरी करण्यात त्यांच्या मनात चुकूनही कधी वाईट विचार नसतो. वकील वकिली करून पैसा कमावतो. सुतार सुतारकी करून जगतो. मग चोराने चोरी करूनच जीवन कंठले तर त्याच्या नावाने कशाला बोंब मारावी हो ? चोर लोक गरीब जनतेची पिळवणूक कधीच करणार नाहीत. तसे करावयास ते 'सरकार' आहेत थोडेच ! श्रीमंताविषयी त्यांच्या मनात तिटकारा असतो. चोर श्रीमंत लोकांची संपत्ती लुटून त्यांना गरीब बनवतात. समाजात समतोलपणा राखण्यास ते सहकार्य देतात. लोकांना खायला प्यायला पुरेसे मिळत नाही, हे चोराला माहित आहे. म्हणूनच ते खाद्य पेयाना शक्यतो हात लावत नाहीत, ते फक्त संपत्ती लुटतात. कारण त्यांना माहित आहे की, 'पैसा हे विष आहे !' हे विष जनतेने आपल्याजवळ बाळगलेले चोराला कसे आवडेल ? यात चोरांच्या अंगचा दूरदर्शीपणाचा गुण आढळतो.

               'यह गाडी भारतीय जनताकी संपत्ती' असताना तिचा उपभोग करून घेणे  जनतेतील चोरांचे कर्तव्य आहे. नाहीतर आपलेपणा तो काय राहिला ? गाडीतील पंखे बल्ब गाडीत राहू देणे योग्य नाही. कारण त्या मौल्यवान वस्तू आहेत. म्हणून चोरलोक त्या गाडीत राहू देत नाहीत ! शिवाय लहान मुलांना पंख्यात बोट घालण्याची सवय असते. बल्ब फुटल्यावर काचा सर्वत्र पसरतात, त्या अपायकारकच ! पुन्हा चोरांच्या दूरदर्शीपणाचे कौतुक करावेसे वाटते !

           संपत्ती ही समाजाला लागलेली कीड आहे. तिच्यामुळे समाजात भांडण तंटे खून मारामाऱ्या होतात. ही कीड नाहीशी करण्याचा प्रयत्न चोर करतात. मोठमोठे श्रीमंत लोक, अधिकारी वर्ग सरकारला फसवू पाहतात. कारण ते इन्कमट्याक्स चुकवतात. चोरच  त्यांना शासन करू शकतात. अशाप्रकारे चोरांची 'चोरी' हे सामाजिक राजकीय कार्य आहे. त्यांच्यात व 'फुडाऱ्या'त  फरक काय ? फक्त कार्यपद्धतीच्या तंत्रात !

            चोरी करणे हे पाप नाही, कारण एवढे थोर भगवान श्रीकृष्ण ! परंतु त्यांनी आपल्या आयुष्यात चोरीचा धंदा केलेला आहेच की ! मग म्हणाल तुम्ही की, चोरी हे पाप आहे म्हणून ! श्रीकृष्णच जर पाप करू लागले तर मग चोरांनी काय करायचे हो ? लोण्याची, दह्याची, ताकाची चोरी ही नुसती गंमत आहे. अशी गम्मत करणे फक्त श्रीकृष्णच करू जाणोत ! कृष्णलीला व चौर्यलीला दोन्हीही गंमतीदारच !

        अर्जुनाने मत्स्यवेध करताना जे कौशल्य दाखवले ते कौशल्य चोरापाशी असते. एखादे घर लुटायचे म्हणजे त्या घरातील माणसे केव्हा काय करतात, केव्हा फिरायला जातात, कोणत्या वेळेस झोपतात- या सर्व गोष्टींची सम्यक् माहिती चोराला काढायची असतेच. ही झाली प्राथमिक माहिती ! प्रत्यक्ष चोरी करतेवेळी तर कितीक गोष्टींकडे चोराला लक्ष द्यावे लागते !  त्याला अंधारात मांजराचे डोळे घेऊन वावरावे लागते . शब्दवेध करणाऱ्या पृथ्वीराज चौहानाप्रमाणे कान सारखे टवकारावे लागतात. तर सराईत खाटीक ज्याप्रमाणे हात चालवतो, त्याप्रमाणे त्याला आपले हात सुटकेसच्या कुलुपांवर चालवावे लागतात. ठराविक वेळात त्याला ठरलेले काम पार पाडावेच लागते. त्याला रेल्वेच्या गाड्याप्रमाणे असून भागत नाही. नाही तर मग चोरीसाठी जे 'स्थळ' त्याने 'पसंत' केलेले असते, तेथेच त्याला 'चतुर्भुज' होण्याची पाळी  येते ! 

                 चोरी कुठे, केव्हा, कशी करावी याचे तंत्र आहे. चोरी करणे येरागबाळ्याचे काम नाही. चोरी ही जातीच्याच चोराला शोभून दिसते. कुणीतरी 'चोरी' या विषयासंबंधी म्हटलेच आहे- "केल्याने होत आहे रे, आधी केलीचि पाहिजे !" ज्या गोष्टीची चोरी केली जाते, त्यावरून चोरांचे प्रकार आढळतात. काही वर्षांपूर्वी केवळ सुंदर स्त्रियांची चुंबने चोरून घेण्यासाठी एक 'चुंबनचोर' अगदी जगप्रसिद्ध झाला होता, हे सर्वश्रुत आहेच ! काही भुरटे चोर असतात, काही मुर्गीचोर, तर काही पाकीटचोर ! ठराविक चोर ठराविक धंद्यातले 'पेशालिष्ट' असतात !उदाहरणार्थ, नेहमी घरफोडी करणाऱ्या चोराला खिसे कापण्यास जमणार नाहीत किंवा मुर्गी पळवण्यात पटाईत असलेल्या चोराला घर फोडणे जमेलच असे नाही ! दरोडेखोर ही चोरांची सुधारून वाढलेली आवृत्ती आहे. अनेक चोरांनी मिळून केलेली मोठ्ठी चोरी म्हणजे दरोडा ! चोरांची बरीच माहिती मला असली तरी, चोराला प्रत्यक्ष पाहण्यास मात्र मला कधीच संधी मिळाली नाही, हे माझे दुर्दैव !

        लहानपणी मी एकदा मित्राच्या घरी गेलो होतो. तेव्हा मित्र नुकताच कुठेतरी बाहेर गेला होता. त्याच्या घरात विशेष माणसे नव्हतीच. मित्र घरात नसल्याने मी परत निघालो. परंतु तेवढ्यात एका खोलीतून हसण्याचा आवाज आला व पाठोपाठ एक वाक्य कानावर अस्पष्टपणे - "अरे चोरा, आता तरी सापडलास की नाही ?" मी उत्सुकतेने 'चोरा'स पाहण्याच्या हेतूने खोलीच्या दरवाजाच्या फटीतून चोरून (!) पाहिले ! - खोलीत मित्राची कॉलेजात जाणारी थोरली बहीण व दुसरा एक तरुण पलंगावर हातात हात घेऊन बसले होते ! त्यावेळी मला समजले नाही की, मित्राची बहीण त्या तरुणाला 'चोर' का म्हणाली ते ! परंतु मोठा झाल्यावर मला समजले की, चोरांच्या अनेक प्रकारांपैकी 'हृदयचोर' ह्या प्रकारात मोडणारा तो तरुण होता !

             चोराला कुठलीच जागा वर्ज्य नाही. तिन्ही लोकात त्याचा संचार असतो. तो आशावादी असतो. भेट दिलेल्या ठिकाणापासून तो रिक्त हस्ताने कधी परत येत नाही. जगण्यासाठी त्याची सदोदित धडपड चालूच असते. जगण्यासाठीच  तो तुरुंगात  जातो व जगण्यासाठीच तो तुरुंगाबाहेर पडण्याची खटपट चालू ठेवतो. कुठे काय मिळते, याबद्दल त्याचे अहोरात्र संशोधन चालते. शिक्षा व (चोरीचे-) शिक्षण हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय !

             चोर हा खरा रसिक असतो. उजेड जसा त्याला आवडतो, तसा अंधारही त्याला प्रिय वाटतो. त्याच्या मनात कधी काळोख नसतो. म्हणतात ना- "चोराच्या मनात ...!"   त्याला 'निशाचर' 'रजनीचर' वगैरे नावेही आहेत. चोरास फार पुरातनकालापासून अनन्यसाधारण महत्व आहे. लोणी चोरणाऱ्या बालकृष्णापासून ते हल्लीच्या इंग्रजी वाड.मयाची चोरी करणाऱ्या लेखकूपर्यंत 'चोर' जातीचा वंशविस्तार झालेला आपल्याला आढळतो. थंडीच्या रक्षणार्थ लोकर, उन्हाच्या रक्षणार्थ गॉगल, तसे खास चोरांच्या रक्षणार्थ सरकारने पोलीसखाते निर्माण केलेले आहे !        

            पूर्वीच्याकाळी चोराला फार महत्व दिले जात होते. हे आपल्याला एका उदाहरणावरून स्पष्ट होईल-
     पूर्वी चोर व संन्यासी या दोघांचाही सुळसुळाट झाला होता. तरीही एखादी चोरी मारामारी झाल्यास त्याबद्दल संन्याशास पकडले जात असे व त्यालाच चोरी केल्याच्या अपराधावरून फाशी दिले जात असे व चोराला जीवदान दिले जाई ! तेव्हापासून 'चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यावे'-अशी म्हण प्रचारात आली, ती खास चोरांच्या सन्मानार्थ ! नाहीतरी संन्यासी वृत्तीच्या लोकांचा जगात उपयोग नाही, हे आजच्या काळातही आपल्याला पटते, नाही का ! चोरांचे महत्व अवर्णनीय आहे, म्हणूनच एखादा चोर सापडला तर, त्याला तुरुंगात स्मरणपूर्वक जतन करून येत असते !

             चोरांची माहिती प्रत्येकाला लहानपणापासूनच असणे आवश्यक आहे. पहिल्या यत्तेच्या पुस्तकातील "मी कोण ?" धड्यात मला पुढील ओळी असणे आवश्यक वाटते-
" कुलूप तोडतो, दार फोडतो,
घर सगळे धुवून टाकतो -
तर मी कोण ? "
.
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा