लहरी

प्रेयसी
बरोबर असताना,
पाऊस
येतच नाही..


प्रेयसी
बरोबर नसताना,
हमखास
येऊन जातो -


वाण नाही
पण त्याला
गुण लागले
असावेत प्रेयसीचे.....


नको तेव्हा
तोंड दाखवायचे..
हवे तेव्हा नेमके
गुल व्हायचे .. !

.

'मोह -'

भुलवले मन किती
टिमटिमणाऱ्या ताऱ्यांनी ..

झुलवले तन कसे
टपटपणाऱ्या प्राजक्तफुलांनी ..

हरवले क्षण किती
हुरहुरणाऱ्या त्या आठवणीतुनी ..

फिरवले मन कसे
झरझर त्या निसर्गसृष्टीतुनी ..


ठरवले किती जरी
वरवर रहायचे हे आज दुर्लक्षुनी .. !

.

जालीम गोळी चारोळीची

दिवसभर मंडपातल्या वाद्यांचा ढणढणाट,
आणि गणपतीपुढची प्रेमगीत ऐकून,
जाम कंटाळलो होतो.
त्यात दिवसभर बायकोची "एकेरी वाहतुकीची" बडबड !

रात्र उजाडली...
अंथरुणावर पडलो तरी बडबड झोपायची काहीच चिन्ह दिसेनात !
शेवटी एक आयडिया सुचली आणि बायकोला म्हटलं -

"तू एकच क्षणभर गप्प बसतेस का ?
तुला मी शेजारणीची एक गंमत सांगतो."

लगेच तिची बडबड थांबली आणि कान टवकारले गेले.
ती संधी अचूक साधून मी म्हणालो -
"आधी ही आत्ताच मनात सुचलेली,

 माझी ताजी चारोळी तुला ऐकवतो !"

काय आश्चर्य कुणास ठाऊक ..
दुसऱ्या क्षणी,
ती मात्रा लागू पडून -
तिच्या घोरण्याचा आवाज हॉलभर ऐकू येऊ लागला !

त्या घोरण्याच्या तालात मी कधी झोपलो ते मलाही कळलेच नाही .

---- तात्पर्य :
काही वेळेला झोपेची गोळी लागू पडत नाही,
पण कवीची चारोळी..........?
.

प्रांजळ मत

त्या मोनालिसाच इतकं का कौतुक करतात-
हे मला पामराला तरी आजवर कळले नाही !

मुळात ती रडून हसते का हसून रडते,
तेही तिच्या चित्रावरून मला कळत नाही.


कुण्या एकाने वारेमाप कौतुक केले -
म्हणून बाकीचे करू लागले असावेत !

गूढ हास्य म्हणजे...
कुणाला न कळलेले हास्य !

कुणाला जे कळलेच नाही....
त्यात कसले बोड्ख्याचे कौतुक ?

बिनवस्त्राच्या गावभर हिंडणाऱ्या,

 त्या राजाची गोष्ट आठवते ना ?
.

सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते -

  
आजपासून ....

बरीच सेलेब्रिटीज मंडळी,

बऱ्याच सेलेब्रिटीज मंडळींच्या गणपतीला 

आणि देखाव्यांना भेट देऊन येतील ......


बरे वाटते !


बऱ्याच वृत्तपत्रांनी

दूरदर्शन वाहिन्यांनी त्या सर्व सेलेब्रिटीज मंडळींचेही,

वारेमाप कौतुक केलेले दिसेल .........


आणखी बरे वाटले !!


पण -

ऋण काढून गणपतीचा सण साजऱ्या करणाऱ्या मंडळींचे,

किंवा झोपडीत,

किंवा पत्र्याच्या शेडमधील,

किंवा खोपटातल्या गरीब गणपतीचे छान छान फोटो,

वृत्तपत्रात आणि विविध वाहिन्यांवर झळकलेले दिसले तर.....


सोन्याहून पिवळेअसे खुद्द श्रीगणेशालाही नक्कीच वाटेल ना !
.

पदक


नेत्याच्या, 

आमदाराच्या, 

नामदाराच्या,

खासदाराच्या पोराला-

" जवान " म्हणून....

 सीमेवरच्या लढाईच्या धुमश्चक्रीमुळे-

" मरणोत्तर एखादे पदक " 

मिळाल्याची एखादी तरी बातमी,

आजपर्यंत -

कधी वाचण्यात आली का हो ?
.

तीन चारोळ्या

१.
वाहतील शिव्यांची लाखोली 
वचने कधी न उच्चारावी-
वाहतील ते आदरांजली 
नित्यच भाषा ऐसी बोलावी..
.


२.कान डोळे बंद करुनी 
जाणतो ना "कर्म" त्याचे- 
द्वेष करणे "जात" बघुनी 
जीवनाचे तत्व ह्याचे..
.


३.
होत्या देत छान गारवा 
उन्हाळ्यात त्या जुन्या आठवणी-
शेकोटीच ऊबदार जणु 
हिवाळ्यात त्या जुन्या आठवणी..
.

कवितेचे दु:ख -

 कागद हरवला
कोपऱ्यात सापडला
मावेना आनंद
हृदयात झालेला ..

कागद होता तो
कविता लिहिलेला
वाईट वाटले खूप
कागद चुरगळलेला ..

कागद तसा साधाच
कुणीतरी टाकलेला
वाचून कवितेला
फेकून टाळलेला ..

माझ्या हातात मी
कागद धरलेला
किंचित थरथर
थोडा ओलावलेला ..

कवितेचा त्यावर
अश्रू झरलेला ....!

.

आयुष्याचा पावा

कसा घडविलास रे देवा
माझ्या आयुष्याचा पावा ..

नीट मी वाजवण्या बघतो
सूर आता बेसूर उमटतो ..

वाजवतो मी व्यथा जरी
हर्ष नादतो मधुर तरी ..

आनंदाने वाजवतो मी
आर्त स्वर का निघती नेहमी ..

वाजवून मी थकलो देवा
केला कितीतरी मी धावा ..

बघ बोटे ही माझी थकली
पाव्यानेही मान टाकली ..

घेई परत तुझा तू पावा
शरणागत मी तुजला देवा !

.

मनीचा डबा


सकाळी सकाळी लौकर उठून
दप्तरात ठेवला डबा भरून ..

निघाली शाळेत मनीमावशी
मनीच्या बोटाला नीट धरून ..


मनीने विचारले- "डब्यात काय"
मावशी म्हणाली- "उंदराचे पाय" ..


मनी म्हणाली जोरात हसून-
"कंटाळले रोज उंदीर खाऊन" ..


मावशी म्हणाली- "इलाज नाही...
चिमणी कावळा सापडत नाही !"

.