राष्ट्रपतींचा निर्णय -



राष्ट्रपतींचा निर्णय लांबल्यास फाशीऐवजी जन्मठेप द्यावी?

वर्तमानपत्रातील वरील शीर्षकाच्या बातमीने चांगलेच लक्ष वेधून घेतले ! पंजाबमधील फाशीची शिक्षा झालेल्या  दहशतवादी भुल्लर याने राष्ट्रपतींकडे 'साडेसात वर्षांपूर्वी ' दयेचा अर्ज केलेला आहे. बिचा-याची (!) तब्येत , दहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच असल्याने, ठीक नाही. त्यामुळे ' आपल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत व्हावे ' , अशी मागणी करणा-या भुल्लरच्या  याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे!

राष्ट्रपतीकडे सादर केलेल्या दयेच्या याचिकेवर दीर्घकाळ निर्णय न झाल्यास संबंधित गुन्हेगाराच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात यावे , अशा प्रकारची मागणी भुल्लरच्या याचिकेत केलेली आहे.

              राष्ट्रपतीनी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीच्या दयेच्या अर्जावर ' अमुक मुदतीत ' निर्णय द्यावा, अन्यथा तसा निर्णय ' तमुक मुदतीत न दिल्यास , फाशीऐवजी जन्मठेप द्यावी - ' असा कायदा करावा लागेल काय? एकतर राष्ट्रपतींच्या कामकाज पद्धतीवर ही टीका वाटत  आहे , दुसरे म्हणजे आरोपीच्या मागणीवर कायदा-बदल होणे , ही विसंगती वाटते!

              यावर असे म्हणावेसे वाटते की न्यायाची बूज राखण्यासाठी, राष्ट्रपतीनी  आपल्या 'भारतभर चालत राहणाऱ्या दौ-यातल्या  , वेळ-काढू धोरणा'तून ,   ' पुरेसा वेळ ' दयेच्या अर्जावरील 'महत्वाच्या पण अति-प्रलंबित निर्णयां 'साठी,  अतिशीघ्रतेने काढावा ! राष्ट्रपतींच्या प्रलंबित निर्णयामुळे अंतिमत: आमचाच पैसा गुन्हेगारांच्या 'पालन-पोषणा 'त खर्च होत आहे, हेही दुर्लक्षून चालणार नाही!

              त्या क्रूरकर्मा निर्दयी कसाबाला फासावर लवकरात लवकर लटकलेले पहायला सा-या जगातल्या भारतियांचे डोळे लागून राहिले आहेत हो ,राष्ट्रपती महोदया! त्याशिवाय शहिदांच्या आत्म्याला शांती मिळणारच नाही ; असे मला तरी  वाटते , ... तुम्हाला ?

तीन चारोळ्या -

१.
जीवनवस्त्र -

चार सुखाचे धागे तुझे
चार दुःखाचे धागे माझे -
जीवनवस्त्र विणत हे राहू
सारत चिँता संसारी ओझे ..
.


२.
कालाय तस्मै नम:

गोंडा घोळत होतो मी 
एकेकाळी जिच्याभोवती -
पिंगा घालत असते ती
आता माझ्या अवतीभवती ..
.


३.
सार्थक


आम्रतरूखाली मी बसलो
सावलीत अती समाधानाने-
सार्थक वाटुन अस्तित्वाचे
हलल्या फांद्याही आनंदाने ..
.

"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला


( चाल :  असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -)


"आदर्श "  सुंदर  हाच आमचा बंगला
सरकारी दरबारी   'कुणकुण 'ता चांगला !

                         ह्या आमच्या बंगल्याला संधीचं दार -
                         भेसळींच्या पोत्यातनं तिथून वसूल फार !

रोज रोज नोटांच्या ' पेटया ' दोन -
' आल्या आल्या ! '- म्हणायला, छोटासा फोन !

                         ' बिस्किटां'च्या प्राप्तीवर जोर छानदार -
                         ' परमिटां'च्या भांडणात फुल्ल हाल हाल ! 

खंडणी-खोरामागे बंदा हा रहातो,
मोठ्याशा फायलीशी लपाछपी खेळतो !

                         ' उच्च उच्च डोक्यां 'चा खेळ रंगला ;
                         लफड्यांचा घोटाळा   ' वर '   टांगला !

किती किती सुंदर  हाच आमचा बंगला !
भूखंड लाटूनी छानछानसा बांधला !!

चार चारोळ्या -

१.
दुष्काळ ..
घरात धान्याचे दाणे
मुठभर शिजवून खायाला -
शरीरात पिचलेली हाडे
चुलीत मोजून घालायाला ..
.

२.
हुरहूर -
जायचे असेल निघून तर खुश्शाल जा,
मला काही वाटणार नाही -
जाताना तू मागे वळून पाहिलेस तर मात्र,
मला ते बघवणार नाही ..
.

 

३.
कविता ..
ढग शब्दांचे गडगडतात
वीज कल्पनेची कडाडते -
बरसात विचारांची होते
मनातून कविता वाहू लागते ..
.
 
४.

मनातले -आला पाऊस अचानक जरी
आपले एक बरे असते -
आपण दोघांनीही छत्री
घरीच विसरलेली असते ..
.

मन उगाच भरकटते -


 नेहमीप्रमाणे सर्व कामं आटपून हातात वर्तमानपत्र घेतलं .

           कुठेतरी कुणीतरी आंदोलन केलं होतं , त्याचा पाठपुरावा म्हणून आंदोलनाविषयी सविस्तर बातमी आली होती . माझी नजर त्या बातमी मधील चौकटीवर खिळली होती. आंदोलन 'संपवण्या'साठी आतुर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचे छायाचित्र त्या चौकटीत दिसत होते. त्यात पोलीस कुणाच्या पाठीवर , कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर - हातातील काठीने जमेल तसा (त्वेषाने-) मार देतांना दिसत होते !

           एका बाजूला पाठमोरा बसलेला एक मरतुकडा ज्येष्ठ नागरीक दिसत होता. ' अहो पोलीसदादा , मी नुसता या  बाजूने चाललो होतो, माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही हो! मला मारू नका ना! ' असा त्याचा एकूण आविर्भाव जाणवत होता.

            त्या आंदोलनाशी, त्या नागरिकाचा  खरोखरच काही संबंध असेल काय  ? माझ्या मनात विचारांचे आंदोलन सुरू झाले...

         गर्दीचे मानसशास्त्र काही वेगळेच असते. कुणी मुद्दाम गर्दी घडवून आणतात, काही ठिकाणी उगाचच गर्दी जमत जाते. हौशे, गवशे, नवशे एकत्र जमले, तरीही त्याचे रूपांतर अकारण गर्दी जमण्यात होते. आंदोलनकर्त्याला फक्त 'गर्दी 'शी मतलब असतो. जणु काही जमलेल्या गर्दीमुळेच तो यशस्वी/अयशस्वी  ठरणार असतो . गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ , वेळेचा अपव्यय , इतरांची कोंडी , गैरप्रकार याचा दूरान्वये विचार त्याने केलेला नसतो. मी आणि माझे आंदोलन , याखेरीज त्याच्या मनात इतर काही नसतेच.


          आंदोलन यशस्वी झाले तर ठीक ! यशाच्या धुंदीत आंदोलनकर्ता खूष , सारं काही आलबेल झाल्यामुळे पोलीस खूष, गर्दीमधला प्रत्येकजण  'मी ' होतो म्हणून तर - तो 'मी' ही खूष! सारे कसे छान छान !

          आंदोलन चिघळले, तर मात्र पोलिसांच्या घोळक्यात, इतमामाने बंदोबस्तात आंदोलनकर्ता गाडीतून गुपचूप अन्य स्थळी रवाना होतो . उरलेल्या पोलिसांच्या तावडीत सापडते, ती वर वर्णन केलेली  ' गर्दी '! त्या गर्दीचे हाल कुत्राही खाऊ शकत नाही , असे होतात. पळापळी, धावपळ, चेंगराचेंगरी ,रेटारेटी यात कुणाचे काय हाल होतील ते प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील सांगण्यास असमर्थ ठरेल! कोण नशीबवान पोलिसाच्या लाठीमारातून सुटेल आणि कोण बदनशिबी पोलिसाच्या काठीचे चवदार खाद्य बनेल, ते सांगता येत नाही. लाठीमारात कुणी नडगी जायबंदी करून घेईल, कुणाची पाठ सुजेल, कुणाचे हात मोडीत निघतील ! शेकडो, हजारो , लाखोंच्या या गर्दीत एखादा निरुपद्रवी ,निरागस, निरपराध माणूस मात्र अमानुषपणाचा हकनाक बळी ठरतो. त्या माणसाला शहाणपणाने आधीच तेथून पळून जायचे जमले नसल्याने, तो पोलिसांच्या तावडीत अलगद सापडतो. मग  सुक्याबरोबर ओलेही जळताना दिसते!

          या सगळ्या पार्श्वभूमीवर , माझे मन आंदोलनातून विचारचक्रात  भलतीकडेच फिरत गेले !
 कुठले आंदोलन , कुठले पोलीस आणि कसली गर्दी ? ....

           ज्याच्या खांदयावर मान ठेवून निर्धास्त फिरावे , असा माझ्याच मायदेशातील पोलीस  माझ्याच एखाद्या निष्पाप , पाप्याचे पितर दिसणाऱ्या  बांधवावर ,  'खाऊ की गिळू ' या नजरेने पहात , 'सात जन्माचा वैरी वा दावेदार सापडल्या'च्या आनंदात हातात लाठी घेऊन यथेच्छ तुडून पडतांना दिसावा ?
     - आणि तो परदेशातून येऊन भर गर्दीत, सर्वांच्या समोर बेछूट गोळीबार करून, मनुष्यहत्या करून, दोषी ठरलेला नीचोत्तम , विश्वासघातकी , क्रूरकर्मा अजमल कसाब - आज आमच्याच पोलिसांच्या खांद्यावर मान ठेवून आमच्या जिवावर, पैशावर , हवाल्यावर तुरुंगात का असेना पण आरामात हवे ते मागत , फासावर न लटकता, किती दिवस चैन करणार आहे ; हे मायबाप सरकारलाही ठाऊक नाही !
                                                                                                                                                                                                                                                                         स्वदेशात हात ,पाय किंवा डोके फोडून घेऊन जायबंदी अवस्थेत शंभर वर्षे जगण्यापेक्षा, परदेशात जाऊन   'अजमल कसाब होऊन, थोडे दिवस राजेशाही थाटात जगून पहावे काय ? ' - असा मनात आलेला नतद्रष्ट, 'नापाक'  ( कु-)विचार मात्र मी मनातल्या मनातच पटकन झटकून, हद्दपार करून टाकला! 

     माणसाचं मन किती विचित्र असतं ना? केव्हां, कुठे, कधी, कसे भरकटेल , कोण सांगू शकेल ?     

' चहा '

एक वर्ग'चहा प्या'म्हणणारा आहे.चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते,असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते असे त्या वर्गाकडून म्हटले जाते.
दुसरा वर्ग 'चहा कधीही पिऊ नये'म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा,महाराजाने सांगितले म्हणून 'आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले(-काही नुकसान झाले नसल्याचा,अनुभव पाठीशी असला तरीही!)',असे सांगतात
.सामान्य माणूस जास्त खोलात न जाता,'कुणी काहीही म्हणो,मी चहा पिणार'-म्हणत जमेल तितक्या वेळा चहा पितो.त्याला आरोग्याच्या दृष्टीने अपाय झालेलाही दिसून येत नाही,ही वस्तुस्थिती!
'चहा प्यावा किंवा चहा पिऊ नये',संभ्रमावस्थेत काय करावे ?

मैफील आज जमली ना रंग खास भरला - [गझल]


वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
--------------------------------------------------
मैफील आज जमली ना रंग खास भरला  
दिसली समोर ना ती कोठेतरी हरवला 

मी देवळात दमलो देवीस शोधताना  
माता घरात दिसली दारात जीव हसला

शोधीत कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो 
शेजारधर्म नाते जपण्यात तो मिसळला 

पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा 
गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला

का मित्र मीच जपला मागून घात केला
वैरी समोरुनी का जाता उगाच हसला 
.

उंट जिराफ जिगरी दोस्त



उंट जिराफ जिगरी दोस्त
फोटो काढू म्हणाले मस्त -
फोटो काढला हसरा छान 
अडकून बसली मानेत मान !

           कांगारू म्हणाले पिल्लाला
           चल रे जाऊ फिरायला -
           पिल्लू बसले ऐटीत
           आईच्या पोटाच्या पिशवीत !

मोकळी हवा घेण्यासाठी
मासा पाण्याबाहेर आला -
बगळा स्वागत करण्यासाठी   
एका पायावर तयार झाला !

          ससोबा रॉकेटमध्ये बसून
          पृथ्वीभवती गरगर फिरले -
          ढगांचा गडगडाट ऐकून
          चांदोबाच्या कुशीत शिरले !

आरडा ओरडा करता करता 
मुंगीचा बसला हो घसा - 
आवाज तिचा आपल्याला
आता ऐकू येईल कसा ?



दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !


( चाल :  शूर आम्ही सरदार आम्हाला )

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ|

                मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत
                दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत
                लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१|

धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं 
सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं 
आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२|

( सूज्ञांस संदर्भ वे. सां. न. ! )

लिहिण्यास कारण की -


तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत  दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे? जेवणाचे ताट पुढयात घेऊन, हातातला घास गालात-नाकात-तोंडात व्यवस्थित जातोय का ?- याची फिकीर न करता ' कसलाही ' कार्यक्रम हस्त-यंत्राद्वारे  चाचपणी करत, बदलत पहाणाऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच! निदान येता जाता तरी 'दूरदर्शन संचावरील एकही कार्यक्रम " आज नजर टाकूनही पाहिला नाही, याची मनाला सतत टोचणी लागून राहिलेले 'आता ऑफिसात तोंड कसे दाखवावे ? ' या चिंतेने काळजीग्रस्त झालेले दिसतात !
      ज्यांना बातम्या ऐकायच्या नाहीत , ज्यांना मालिका पहायच्या नाहीत, ज्यांना दूरदर्शन वरील स्पर्धा पहायच्या नाहीत आणि  ज्यांना दूरदर्शनमधे काडीमात्रहि  स्वारस्य नाही - अशी माणसे ' सुखी 'असणार यात शंकाच नाही ! सुखी माणसांना मन गुंतवायला इतर असंख्य उद्योग आहेत. बातम्या नाही ऐकल्या/पाहिल्या तर आकाश कोसळणार नाही ! मालिकांच्या पात्रांत गुंतून पडलो तर त्यांच्या बापजाद्यांची इस्टेट आपली थोडीच होणार आहे ? नाही गुंतलो तरी आपण नरकात थोडेच जाणार आहोत ! ' एस एम एस ' वरच १०१ टक्के अवलंबून असणाऱ्या स्पर्धात भाग नाही घेतला , मरणोत्तर तर आपल्या पिंडाला कावळा शिवायचा थोडाच राहणार आहे - अशा निर्गुण ,निराकार, स्वस्थ , स्थितप्रज्ञ ,उदास ,भकास वृत्तीने जगणारी माणसे खरीच सुखी नाहीत काय ? दूरदर्शनवर दिसणारे जगातील  असंख्य घोटाळे , अगणित भानगडी-लफडी , अतुलनीय भ्रष्टाचार , अवर्णनीय "आदर्श ", अनंत लाचखोर -असल्या फालतू  गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी आपण बरे नि आपले काम (- न केलेले ) बरे !

 लिहिण्यास कारण की -

मी चुकून 'जाला'समोर न बसता , दूरदर्शन संचासमोर समोर बसलो (-आणि तिथेच फसलो !). कुठली तरी टुकार ( - पण घरातल्या तमाम महिला वर्गमतानुसार निदान  १०००० तरी भाग पूर्ण करणारी ?)मालिका चालू -- एका पात्राने  एक शब्द उच्चारण्याचा अवकाश की, पार्श्वसंगीत म्हणून ताट-वाट्या -पातेली -चमचे -डाव वगैरे एकसमयावच्छेदेकरून दणादण कानावर आदळल्याचा आवाज येई ! संगीतकार जाउ द्या (-त्याला काही कळत नसेल !) ; पण मालिकेतील पात्रे, दिग्दर्शक ,इतर सहकारी (-निदान स्पॉट बॉईज  तरी ?) यांच्या क्डून तरी पार्श्वसंगीत कानाला सुसह्य वाटते /जाणवते का  नाही, हे जाणून घेण्याची तसदीही कुणी घेतली नाही , याचे 'प्रचंड' आश्चर्य वाटते! हा एक भाग झाला ; तदनंतरचे 'महा'आश्चर्य म्हणजे एका पात्राने दुसऱ्या पात्राकडे नजर टाकली की , राहिलेल्या ८/९ पैकी  'प्रत्येक ' पात्राची प्रतिक्रिया /प्रतिसाद जाणून घेण्यासाठी - त्याच्या चेहऱ्यावर काहीकाळ क्यामेरा स्थिर !! मला सांगा , अशा रीतीने कासावापेक्षाही संथ गतीने मालिका चालू राहिली तर १०००० नव्हे तर १०००००० भाग नाही झाले तरच .... ?
धन्य धन्य हो - मालिका निर्मात्याची , दिग्दर्शकाची , संगीतकाराची , (आवडत नसली तरी, पोटासाठी -) काम करणारे कलाकार आणि त्या " मूर्ख-खोक्या " पुढे ठिय्या मांडणा-या सर्वांची !

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती


( चाल :  इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी  )

नव्या साडीसाठी  - दोघांची भ्रमंती
चालली  खरेदी.. थांबेना ती  |धृ |

सवलतींचा ताजा - लागतो ढीग
नाचती विक्रेते.. मागे पुढे  |१|   नव्या साडीसाठी -

माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब
भांडणात वाढ.. पत्नीसंगे  |२|  नव्या साडीसाठी -

मागची उधारी - राहिली अजून
जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही  |३|  नव्या साडीसाठी -