एकच इच्छा !


आता गणेशोत्सव संपलेला आहे ! 
अंगारकी नाही, विनायकी नाही, गणेशजयंती दूर...
 सध्या निवांतच !

रोजच्याप्रमाणे मी देवळात उभा ...
आश्चर्य म्हणजे,
समोर गाभाऱ्यातच मला ...
 
सर्व ठिकाणचे -
" राजे, शेठ, श्रीमंत, मानाचे आणि नवसाला पावणारे जागृत
श्रीगणेश "...
थोडेसे निद्रिस्त अवस्थेत बसलेले भासले .
 
विलक्षण दृष्य होते हो ....

मी आनंदाने डोळे मिटले आणि आळवणी सुरू केली ..

" हे समस्त श्री गणेशांनो,
मी एक त्रासलेला, गांजलेला, पिचून निघालेला,
पिळून निघालेला एक आमआदमी विनंती कम् प्रार्थना करतो की,
कसलीही पावती न फाडता -
कुणाचाही वशिला न लावता -
तुमच्या पायाशी पोचल्यावर, कुणीही बेजबाबदारपणे हुसकावून न लावता -
कुणाचीही ओळखपाळख, चिठ्ठीचपाटी न लागता -
तुमचे दर्शन मला विनासायास, विनात्रास व्हावे,
एवढी एकच इच्छा
 आपणासर्वांसमोर हात जोडून व्यक्त करतो आणि ...."

माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच-

" हा काय भलतच बरळत आहे ..चला, निघूया इथून पट्कन .."
अशाप्रकारची कुजबुज आणि हालचाल माझ्या कानाशी आली, 
म्हणून मी डोळे उघडले .........
 
गाभारा पूर्ण रिकामा दिसत होता !!!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा