काल रविवार ,
सुट्टीचा दिवस ,
होळी पौर्णिमेपासून पुरणपोळी श्रीखंडपुरी असले रोज यथेच्छ गोड गोड खाऊन -
कंटाळा आला बुवा !
आता काही तरी बदल हवा म्हणून ,
काल मी एक संपूर्ण दिवस उपास करायचा ठरवले !
सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ....
झाले ..शनिवारी शनिवारचा उपास होताच !
रविवारी सकाळी सहालाच -
भुकेने पोटात सगळेच पशुपक्षी ओरडून ,
चांगलाच धुमाकूळ घालू लागले !
उपास म्हणजे फलाहार चालतो ...इति सौभाग्यवती !
म्हटले,
बायकोचे नाही, तर कुणाचे ऐकायचे अशा बिकट प्रसंगी ?
एक कलिंगड, दोन सफरचंद, तीन केळी, चार अंजीर, पाच चिक्कू ...
बस्स, एवढेच फराळासाठी म्हणून खाल्ले. ...
म्हटलं उपास मोडायला नको ..
आणि एकदा ठरवले ते मनापासून पार पाडायला तर हवेच ना !
सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी,
बायकोच्या माहेरची मंडळी आली ...
त्यानी खास माझ्यासाठी
डाळिंब, फणसाचे गरे, संत्री, दोन डझन हापूस आंबे आणलेले !
त्यांच्या प्रेमाचा अव्हेर कसा करायचा ?
.......म्हणून दिवसभर मी एक एक करून खात बसलो !
संध्याकाळी सहा वाजता -
फक्त एक तांब्याभरून मिल्कशेक प्यालो !
काही म्हणा,
आपली नाजूक तब्येत नीट सांभाळायची असेल तर ...
प्रत्येकाने रोज असा उपास करायला हवाच -
या निष्कर्षाला मी तरी आलो आहे !
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा